घोकंपट्टी थांबणार; क्षमताधिष्ठित प्रश्नांवर अधिक भर

घोकंपट्टी थांबणार; क्षमताधिष्ठित प्रश्नांवर अधिक भर

Published on

शिरगाव ता. ११ : विद्यार्थ्यांवर ताण राहू नये आणि अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या पाठ्यक्रम आराखड्याला अंतिम स्वरुप मिळाल्यावर आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून यंदाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर अधिक भर दिला जाणार आहे. त्यामुळे, पूर्वापार पद्धतीने चालत आलेली विद्यार्थ्यांची घोकंपट्टी आता हळूहळू थांबणार आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा सात ते दहा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतला आहे. तसे वेळापत्रकही मंडळाने आपल्या संकेतस्थळावर टाकले आहे. त्यामुळे, या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यावर दडपण येणार आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे. त्याचा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून मंडळाने त्यावर जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे.

काय असणार बदल ?
- सुरुवातीला नववी ते अकरावीसाठी आणि त्यानंतर बारावीसाठीही आराखडा लागू
- तिसरी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा दोन सत्रांत होणार
- नवीन आराखड्यात आरोग्य, कला व व्यावसायिक शिक्षणावर भर
- पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून ज्ञाननिर्मिती व ज्ञानवृद्धी करण्याचा हेतू
- इयत्ता तिसरीपासून व्यावसायिक शिक्षण, तिसरी ते आठवीसाठी व्यावसायिक कौशल्ये
- नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय
- व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असे नावीन्यपूर्ण विषय

विद्यार्थ्याची क्षमता पडताळणी होणार
आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा दहावी-बारावी सोडून इतर वर्गासाठी लागू होईल. त्यानंतर नवीन आराखड्यानुसार दहावी, बारावीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलेल, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्न सर्वाधिक असतील. एखादा विषय विद्यार्थ्यांना किती समजला ?, प्रत्यक्ष जीवनात तो त्या शिक्षणाचा वापर करतोय का ?, ही क्षमता पडताळली केली जाणार आहे. २०२५- २६ नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल अपेक्षित आहे.

जेईईच्या पूर्वतयारीसाठी तारखांत बदल
दहावी आणि बारावीनंतरच्या परीक्षा जसे ‘जेईई’, ‘एनईईटी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा. तसेच इयत्ता बारावीत कमी गुण मिळालेल्यांना विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारची संधी मिळावी, पुढील प्रवेशासाठी अडचण येऊ नये म्हणून आगामी परीक्षा नेहमीपेक्षा ७ ते १० दिवस अगोदर घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यावर २३ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना मागविल्या होत्या. अंदाजे १० हजारांपर्यंत हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यांचा अभ्यास केल्यानंतर हे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असल्‍याचे समजते. त्यामुळे, बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च; तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतल्या जाणार आहेत.

यावर्षी परीक्षा लवकर घेतली तरी अभ्यास तर आम्हाला करावा लागणार आहे. फरक एवढाच आहे की, रोज थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. थोडे दडपण आहे. परंतु त्यावर मात करून अभ्यास करावा लागेल.
- राधा झा, विद्यार्थिनी, इयत्ता दहावी

वेळ जरी कमी असला तरी मुलांनी व्यवस्थित नियोजन करून अभ्यास केला; तर यश नक्की मिळेल. वेळ कमी आहे म्हणून दबाव न घेता वेळेचा योग्य उपयोग करून अभ्यास करावा.
- विठ्ठल माळशिकारे, मुख्याध्यापक, बा.न.राजहंस विद्यालय, परंदवडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com