

शिरगाव ता. २ : परिसरात दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. शिरगाव, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, गहूंजे, दारुंब्रे आदी गावांतील शाळांतून घरी जाणारे विद्यार्थी, शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला. या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडाची मोठ्या प्रमाणावर फळ गळती झाली.