

काळेवाडी ता. २८ : उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांची पावले रस्त्याकडेच्या ज्यूस सेंटरकडे वळतात. पण, तेथे मिळणारे आंब्याच्या रसासारखे पेय कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
रस्त्याकडेला मिळणाऱ्या रसातून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तरीही, हे ज्युस बिनभोभाट विकले जात आहेत. अनेक ठिकाणी ताज्या आंब्याऐवजी बनावट किंवा निकृष्ट दर्जाचा ‘मँगो पल्प’ (आंबा गर) वापरला जात आहे. हा पल्प दीर्घकाळ साठवून ठेवलेला असतो, तसेच त्यामध्ये कृत्रिम रंग, फ्लेवर आणि ‘प्रिझर्व्हेटिव्हज’ वापरले जात आहेत. अशा पल्पपासून तयार होणारा ज्युस पिण्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, अन्न विषबाधा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यासोबत अनेक रस केंद्रांवर स्वच्छतेच्या नियमांकडेही दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरगुती किंवा विश्वासार्ह ठिकाणीच ताज्या फळांचा ज्यूस घ्यावा. रस्त्यावरील ज्यूस घेताना स्वच्छता, गराचा दर्जा आणि तयार करण्याची पद्धत याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
रस्त्याकडेच्या ज्यूसच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास ग्राहकांनी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी तक्रारी व नियमित वेळापत्रकानुसार व इतर गुप्त माहितीद्वारे कारवाई सुरू आहे.
- दिगंबर भोगावडे, सहआयुक्त, अन्न औषध प्रशासन