बगळ्यांच्या ४५ पिलांना जीवदान
तळेगावात उद्यान विभाग आणि ‘वन्यजीवरक्षक’च्या  स्वयंसेवकांची सतर्कता

बगळ्यांच्या ४५ पिलांना जीवदान तळेगावात उद्यान विभाग आणि ‘वन्यजीवरक्षक’च्या स्वयंसेवकांची सतर्कता

Published on

तळेगाव स्टेशन, ता. २६ : पावसामुळे उन्मळून पडलेल्या बाभळीच्या झाडांवरील घरट्यांमधून बाहेर फेकले गेलेल्या बगळ्याच्या तब्बल ४५ पिल्लांना तळेगाव दाभाडे उद्यान विभाग आणि वन्यजीवरक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.
आठवडाभरापासून मावळात चालू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी (ता. २५) दुपारी तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकालागतच्या डोळसनाथ कॉलनीमधील जितेंद्र कदम यांच्या राहत्या घरावर एक बाभळीचे झाड कोसळले. त्यावर बऱ्याच पक्ष्यांची घरटी होती.
घटनेची माहिती कळाल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उद्यान विभागप्रमुख सिद्धेश्वर महाजन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पडलेल्या झाडावर बऱ्याच पक्षांची पिल्ले होती. यापैकी काही पिल्ले खाली विव्हळत पडलेली दिसली. त्यांना मांजर आणि भटक्या श्वानापासून धोका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाजन यांनी तत्परतेने, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे प्राणीमित्र नीलेश गराडे यांना माहिती दिली. त्यानंतर वन्यजीव संस्थेचे सदस्य जिगर सोळंकी तिथे पोचले. झाड पडल्यामुळे घरटे मोडल्याने मोठ्या संख्येने बगळ्यांची पिल्ले विव्हळत पडली होती. थोड्याच वेळात नीलेश गराडे, किरण मोकाशी, श्रेयस कांबळे, प्रियांका शर्मा, विकास दौंडकर, गणेश मिसाळ, गणेश ढोरे, भास्कर माळी, अनिश गराडे यांच्यासह वन्यजीव रक्षकचा अख्खा चमू घटनास्थळी पोहोचला. अगदी महिनाभरापेक्षा कमी वयाच्या बहुतांश पिल्लांना अद्याप पंख न फुटल्याने अथवा पंखात बळ नसल्याने बचावासाठी उडता आले नसावे. काही मोठे बगळे उडून गेले. तर,बरेच शेजारच्या झाडांवरून जणू आपल्या पिल्लांचा आर्त आक्रोश पाहत असावेत. कोसळलेल्या झाडाच्या फांद्यांखाली काही पिल्ले अडकली होती. तसेच इतरत्र पडलेल्या जखमी आणि उडण्यास असमर्थ असलेल्या बगळ्यांच्या पंचेचाळीस पिल्लांची सुटका करून अलगद पकडत संरक्षक पिंजऱ्यात उचलून ठेवण्यात आले. दुर्दैवाने तीन पिल्ले मृतावस्थेत आढळून आली. पुणे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे आणि वडगांव मावळचे विभागीय वनाधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे येथील रेस्कू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकास बोलावून पुढील उपचारासाठी पाठवण्याचे ठरले. त्यानंतर वनपाल एन. के. हिरेमठ, वनरक्षक योगेश कोकाटे, वनसेवक किसन गावडे यांच्यासह वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी पिंजऱ्यात ठेवलेले सगळे पक्षी सुखरूप रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाच्या ताब्यात देऊन मुळशी तालुक्यातील भूगाव येथे पाठवण्यात आले आहेत. उपचारानंतर पिले सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा आहे त्या परिसरात आणून सोडण्यात येणार आहे.

बगळ्यांचा अधिवास धोक्यात
तळेगाव दाभाडे परिसरातील खासगी आणि शासकीय जमिनीवरील बाभळीची झाडे अमाप वृक्षतोडीमुळे नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे बगळा पक्षांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. त्यामुळे मानवी वस्तीतील उरल्यासुरल्या बाभळींवर बगळे दाटीवाटीने घरे बांधतात. कोणताही वन्यप्राणी अथवा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास आपल्या परिसरातील प्राणीमित्र किंवा वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.

फोटोः 04437

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.