तळेगाव-चाकण मार्गावरील ब्रिटीशकालीन पूल जीर्ण

तळेगाव-चाकण मार्गावरील ब्रिटीशकालीन पूल जीर्ण
Published on

गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. १८ : दगडी चिरे ढळल्याने तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील तीन ब्रिटीशकालीन पूल जीर्ण झाले आहेत. याबाबत अनभिज्ञता दाखविणारे भारतीय राजमार्ग प्राधिकरण, एमएसआयडीसी अथवा रेल्वे प्रशासन पुलांच्या सुरक्षिततेबाबत अद्यापही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. या तीनही पुलांची सुरक्षितता, मजबुती आणि ते वाहतुकीच्या वापरास योग्य स्थितीत असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.

तळेगाव-चाकण रस्त्यावर २०१५मध्ये टोलबंदी झाल्यानंतर या रस्त्याच्या मालकीसह देखभालीच्या जबाबदारीवरुन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विशेष प्रकल्प विभागाकडून टोलवाटोलवी सुरू होती. २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यनंतर नुकताच हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाने सदर रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ‘बीओटी’ तत्वावर विकसित करण्यास मान्यता दिली आहे. दरम्यानच्या काळात रस्त्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले. कुंडमळा पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

इंदोरीच्या पुलाला अवजड वाहनांचे ‘ओझे’
इंदोरी येथे बाह्यवळण रस्ता झाल्यानंतर इंद्रायणी नदीवर समांतर नवीन पूल झाला. पण, ब्रिटिशकालीन दगडी पुलावरुन गेली अनेक वर्षे जड, अवजड वाहतूक सुरूच आहे. दगडी पुलावर नुकतेच डांबरीकरण करण्यात आल्यानंतर पुलावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपायोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुलावर पाणी साचते. झाडेझुडपे उगवल्याने पुलाच्या कमानींसह कठड्याच्या दगडी थरांतील काही चिरे ढळल्याचे दिसते. त्यामुळे शंभर वर्षांहून अधिक जीवनमान असलेल्या या दगडी पुलाच्या अखंडतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुधा नदीवरील दगडी पुलाचे चिरे ढळले
सुदवडी (ता.मावळ) हद्दीतील सुधा नदीवरील पाच गाळ्यांचा अरुंद दगडी पूल वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनलेला आहे. या पुलावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे. रोज शेकडो ट्रेलर, कंटेनर आणि इतर अवजड वाहने या जीर्ण झालेल्या पुलावरुन चाकणकडे जातात. यामुळे पुलाचे दगडी चिरे ढळले आहेत. तत्कालीन तहसीलदारांच्या सूचनेनुसार ‘‘सुदुंबरे जवळील सुधा नदीवर असलेला शंभर वर्षांहून अधिक जुना झालेला ब्रिटिशकालीन दगडी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद’’ अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम पुणे उत्तरच्या वडगाव मावळ उपविभागाने जून २०२० मध्ये काढली होती. त्याबाबतचे इशारा फलकही लावण्यात आले होते. मात्र, ते गायब झाले आणि दिवसाकाठी जड-अवजड वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. पुलाच्या दगडांमध्ये झाडेझुडपे वाढली आहेत. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन तो वाहतुकीस सुरक्षित आहे की नाही, याबाबत खातरजमा करण्याची मागणी आहे.

तळेगावात लोहमार्गावरील पूल धोकादायक
तळेगाव स्टेशन येथे ब्रिटीशकाळात पुणे-मुंबई लोहमार्गावर दगडी पूल उभारण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून तो रहदारीस बंद असला, तरी पुलाची अखंडता आणि मजबुतीबाबत शाश्वती नाही. झाडाझुडपांनी गराडा घातल्याने पुलाच्या बांधकामाला धोका आहे. समांतर पुलावरुन दुतर्फा वाहतूक सुरू असली, तरी अवजड वाहने आणि लोहमार्गावरून भरधाव जाणाऱ्या रेल्वेगड्यांच्या कंपनांमुळे या दगडी पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आहे. शतकभराहून अधिक कालखंडापूर्वी बांधण्यात आलेला हा दगडी पूल कोसळण्याची भीती आहे. पुरातत्व विभाग, रेल्वे प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने या कालबाह्य दगडी पुलाबाबत निर्णय घेऊन तो पाडावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

अधिकारी म्हणतात...
- ‘‘तळेगाव-चाकण रस्ता एमएसआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कामांची जबाबदारी त्यांची आहे,’’ असे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता पंकज प्रसाद यांनी सांगितले.
- ‘‘तळेगाव-चाकण रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही,’’ असे सांगत ‘एमएसआयडीसी’चे कार्यकारी अभियंता नाझीर नायकवडी यांनी अधिक बोलणे टाळले.
- रेल्वे प्रशासनाने अधिकारी पुलाच्या सुरक्षेबाबत बोलण्यास तयार नाहीत.


नदी नाल्यांवरील पूल नवीन असोत वा जुने, देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर अथवा केली जात नाही. पुलांच्या बांधकामावर झाडे, झुडपे उगवल्याने बांधकामाला भेगा पडून त्या वाढत जातात. दुर्घटना टाळण्यासाठी ठराविक कालावधीत सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे.
- संदीप गोंदेगावे, नागरिक, तळेगाव स्टेशन

अमेरिकेत फेडरल हायवे ॲडमिनिस्ट्रेशनने सर्व पुलांची दर दोन वर्षांनी तपासणी बंधनकारक केली आहे. नॅशनल ब्रिज इन्स्पेक्शन स्टँडर्ड्सच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुलाच्या एकूण स्थितीचे मूल्यमापन केले जाते. शिवाय, सेन्सर्सद्वारे पुलांवरील असंतुलनाचा आढावा घेतला जातो. असुरक्षित पुलांवर तातडीने निर्बंध लादले जातात. दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी विशेष निधी उपलब्ध असतो.
- महेश निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते, तळेगाव स्टेशन

स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी हे दगडी पूल बांधले त्यांना भारतीयांची काळजी असावी. त्यामुळेच त्यांनी आपल्या सरकारला कळवले‌. पण, प्रशासन कदाचित काहीतरी अघटीत घडण्याची वाट पाहत आहे का?
- विद्या काशीद, गृहिणी, इंदोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com