

India Southeast Asia Relations
esakal
महेंद्र सुके - mahendra.suke@esakal.com
काही माणसे प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात नसतात; पण त्यांच्या विचारांचा आणि शब्दांचा प्रभाव काळाच्या ओघात अधिक गडद होत जातो. अरुण शेवते यांची कविता अशाच शांत, संयत आणि जीवनाशी प्रामाणिक संवाद साधणाऱ्या साहित्यपरंपरेचा प्रवास आहे. त्यांच्यावरील डॉ. रणधीर शिंदे संपादित 'तळघर' ग्रंथ या प्रवासाची साक्ष देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो.
मराठी साहित्यात काही कवी असे असतात, की ते प्रकाशझोतात उभे राहत नाहीत; मात्र त्यांच्या शब्दांची सावली अनेक पिढ्यांच्या संवेदनांवर पडत राहते. त्यांची कविता गाजत नाही; पण ती अंतर्मनात दीर्घकाळ निनादत राहते. कवी, लेखक आणि संपादक अरुण शेवते हे अशाच परंपरेतील नाव आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून त्यांनी शब्दांशी जपलेले नाते ही केवळ साहित्यनिर्मिती नसून, एका सजग, संवेदनशील आणि मूल्यनिष्ठ मनाची अखंड साधना आहे. या ५० वर्षांच्या काव्यप्रवासाचा मागोवा घेणारा ‘तळघर’ हा ग्रंथ म्हणजे केवळ निवडक कवितांचा संग्रह नाही; तर तो एका कवीच्या मनोविश्वाचा, त्याच्या जीवनदृष्टीचा आणि काळाशी चाललेल्या संवादाचा साक्षेपी दस्तऐवज आहे.
कवी अरुण शेवते यांनी १९७५ मध्ये काव्यलेखनास सुरुवात केली. आज या सुवर्णमहोत्सवी टप्प्याचे औचित्य साधून ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी त्यांच्या साहित्यसेवेचा, व्यक्तिमत्त्वाचा, तत्त्वचिंतनाचा आणि समाजदृष्टीचा अत्यंत अभ्यासपूर्ण वेध घेत हा ग्रंथ संपादित केला आहे. जवळपास १५ काव्यसंग्रहांमधून निवडलेल्या कविता, विविध प्रस्तावना, पत्रव्यवहार, प्रकाशनप्रसंगी झालेली भाष्ये आणि समकालीन साहित्यिकांनी व्यक्त केलेल्या अभिप्रायासह तयार झालेला हा ग्रंथ अरुण शेवते यांच्या काव्यजाणिवेचा अंतर्मुख करणारा ठेवा आहे.