

Melghat Sangharsh Mahapadyatra
esakal
बच्चू कडू - Bacchuprahar41@gmail.com
मेळघाटाचा प्रश्न केवळ विकासाचा नाही; तर तो न्यायाचा आहे. अनेक वर्षे या भागातील लोकांनी संयमाने शासनाकडे मागण्या केल्या; पण प्रश्न सुटले नाहीत. आमची ‘मेळघाट संघर्ष महापदयात्रा’ केवळ आंदोलन नव्हतं; तर ती मेळघाटातील आदिवासी समुदाय, तेथील शेतकरी बांधवांच्या वेदनेचा आवाज होती.
अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत विसावलेला मेळघाट हा महाराष्ट्राच्या नकाशावर असलेला प्रदेश असला तरी प्रत्यक्षात तो अनेक दशकांपासून शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षतेचा बळी ठरलेला भाग आहे. इथल्या आदिवासी बांधवांच्या जीवनात आजही पाणी, आरोग्य, रस्ते, वीज, शिक्षण आणि रोजगार अशा मूलभूत सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. अनेक शासन बदलले, मंत्री बदलले, विविध योजना जाहीर झाल्या; पण मेळघाटातील वास्तव फारसे बदलले नाही.
मेळघाटाचा प्रश्न केवळ विकासाचा नाही; तर तो न्यायाचा आहे. अनेक वर्षे या भागातील लोकांनी संयमाने शासनाकडे मागण्या केल्या. निवेदने दिली, आंदोलन केले, अधिकाऱ्यांची भेट घेतली; पण या सर्व प्रयत्नांनंतरही प्रश्न सुटले नाहीत. आदिवासींची वेदना, त्यांच्यावर होणारा अन्याय, न मिळणारी मूलभूत सुविधा आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच ‘शेतकरी कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष महापदयात्रा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही यात्रा केवळ आंदोलन नव्हतं; तर ती मेळघाटातील आदिवासी समुदाय, तेथील शेतकरी बांधवांच्या वेदनेचा आवाज होती. शासनाला दिलेला हा स्पष्ट इशारा होता, की आता मेळघाटातील लोक गप्प बसणार नाहीत.