

Bonded Labour Liberation Movement
esakal
विवेक पंडित - pvivek2308@gmail.com
१९९६ ते १९९९ हा काळ संघटनेच्या इतिहासातील अत्यंत कठीण; पण तितकाच घडवणारा कालखंड होता. या काळात ‘शहीद जागर’सारख्या मोहिमांमधून आदिवासी समाजात चेतनेची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न झाला. याच संघर्षमय प्रवासाला एक अनपेक्षित जागतिक मान्यता लाभली, ती म्हणजे वेठबिगार मुक्तीसाठीच्या कार्याबद्दल आम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे आमच्या कामाची जगाने घेतलेली दखल होती आणि आमच्यावर सोपवलेली जबाबदारीही...
संघटनेच्या आयुष्यातील प्रचंड आव्हानात्मक आणि व्यक्तिशः माझ्या जीवनातील कसोटीचा कालखंड असणारा काळ होता १९९६चा. याच काळात ठाणे जिल्ह्याच्या बाहेर मला मुंबईतच राहावं लागत असल्याने मी स्थलांतरित मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. यातूनच बालहक्क अभियान उभं राहिलं आणि प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा मूलभूत अधिकार होण्याआधी महाराष्ट्रात महात्मा फुले शिक्षण हमी योजना संघटना - समर्थनच्या अथक प्रयत्नांमुळे अस्तित्वात आली. सुमारे वर्षभराचा कालावधी गेल्यानंतर अटकपूर्व जामिनावर असणारी माझी अट शिथिल केली गेली आणि माझ्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर माझ्यावरचे सर्व निर्बंध उठवण्यात आले. एक वर्ष संघटनेसोबत प्रत्यक्ष रणभूमीत न राहता संघटनेबाहेरूनच संघटना पाहणं, संघटनेचा विचार करणं, संघटनेचा अभ्यास करणं या काळात माझं सुरूच होतं.