

Chhatrapati Sambhaji Maharaj Budhbhushan
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com
छत्रपती संभाजी महाराज जसे युद्धकलेत निपूण होते तसेच ते शास्त्रार्थामध्येही पारंगत होते. शास्त्रार्थ म्हणजे संस्कृत भाषेत केलेला तात्त्विक वादविवाद (Debate) होय. छत्रपती संभाजी महाराज जसे तलवारबाजीमध्ये तरबेज होते तसेच ते लेखनामध्ये निष्णांत होते. त्यांनी अनेक भाषांत प्रावीण्य मिळवले होते. मराठीबरोबरच हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांमध्ये ते पारंगत होते. त्यांनी ‘नखशिख’, ‘नायिकाभेद’ आणि ‘सातसतक’ हे तीन हिंदीमध्ये ग्रंथ लिहिले. तसेच त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या विद्वत्तेबद्दल, शौर्याबद्दल आणि सौंदर्याबद्दल त्यांचा समकालीन फ्रेंच पर्यटक अॅबे कॅरे म्हणतो, की ‘संभाजी महाराजांसारखा, पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी अन्यत्र पाहिला नाही.’ याचा अर्थ संभाजी महाराजांनी जशी तलवार चालवली तशीच लेखणीदेखील चालवली. ते ज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत उत्तुंग शिखरावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य करणारे त्या काळातील संस्कृत भाषेचे आणि हिंदू धर्मशास्त्राचे महापंडित गागाभट्ट यांनी लिहिलेला ‘समयनय’ हा ग्रंथ त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अर्पण केलेला आहे. यावरून संभाजी महाराज हे संस्कृत भाषा आणि हिंदू धर्मशास्त्र-तत्त्वज्ञानाचे महापंडित होते याची स्पष्ट कल्पना येते. त्यांच्या पांडित्याला विशेषतः त्यांच्या लेखनाला उसंत मिळाली ती प्रचितगडावर!
प्रचितगड हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या जगप्रसिद्ध अशा ‘बुधभूषण’ ग्रंथाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज ऑक्टोबर १६७६ मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांकडे कोकणची जबाबदारी सोपवली. यावेळेस संभाजी महाराजांचे वास्तव प्रचितगड-शृंगारपूर येथे होते. सुमारे दोन वर्षे म्हणजे १६७६ ते १६७८ पर्यंत संभाजी महाराज प्रचितगड-शृंगारपूर येथे वास्तवास होते. या वेळेस ते वीस वर्षे वयाचे होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी ‘बुधभूषण’ हा ग्रंथ प्रचितगड-शृंगारपूर येथे रचला. प्रचितगड हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विद्वत्तेची, शास्त्रार्थाची (तात्त्विक वादविवाद) शौर्याची साक्ष देतो.