

Chhatrapati Shivaji Maharaj administrative reforms and management principles
esakal
विपुल वाघमोडे
भारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते राज्यकर्तृत्वाचे संपूर्ण शास्त्र घडवणारे राष्ट्रनायक होते. मध्ययुगीन भारतात जिथे परकीय सत्ता, धार्मिक दडपशाही आणि शोषण प्रबळ होते, त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य, स्वधर्म आणि स्वसंस्कृती या मूल्यांवर आधारित स्वतंत्र राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी दुर्गावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे निजामशाही, आदिलशाही व मुघल दरबारातील अनुभवी सरदार होते. आई राजमाता जिजाबाई या धार्मिक, संस्कारशील व राजकीय दूरदृष्टी असलेल्या होत्या.यामुळे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात धर्म, शौर्य, करुणा व कर्तव्य यांचा समतोल दिसतो. शिवाजी महाराजांचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. १६४५ पासून शिवाजी महाराजांनी तोरणा, कोंढाणा, राजगड, पुरंदर यांसारखे किल्ले स्वराज्यात सामील केले. ६ जून १६७४, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.