Shivaji Maharaj
Esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहासाचे अभ्यासक
छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण किंवा कर्तृत्व एका देशापुरते किंवा राज्यापुरते मर्यादित नाही, तर ते वैश्विक पातळीवरील आहे. शिवजयंतीनिमित्त या पैलूवर टाकलेला प्रकाश.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करुन रयतेचे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हतबल झालेल्या भूमिपुत्रांच्या मनात धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटवली. आपण महाबलाढ्य शत्रूविरुद्ध लढू शकतो. आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तमप्रकारे राज्यकारभार करु शकतो, ही प्रेरणा जनमानसात विशेषतः सर्वसामान्य मावळ्यांच्या मनात कायमची पेरली. त्यांनी अशक्य कार्य शक्य करुन दाखविले. शेतकरी, कष्टकरी, महिला, उपेक्षित समाजघटकांना धैर्य आणि स्थैर्य दिले. त्यांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी स्वराज्यातील आणि परराज्यातील स्त्रियांचा आदर केला. त्यांना सुरक्षितता दिली.
आपल्या धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचा अभिमान बाळगला, पण इतरांच्या धार्मिक- सांस्कृतिक परंपराचा अनादर केला नाही. आपल्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरांचे त्यांनी मनोभावे संरक्षण केले. त्यांनी आपल्या सांस्कृतिक परंपराचा अभिमान बाळगताना त्याचे अवडंबर केले नाही. ते धार्मिक होते. तेवढेच प्रागतिक विचारांचे होते. त्यामुळेच ‘मुलगा पालथा जन्मला, तर तो दिल्लीची पातशाही पालथी घालील” असे ते म्हणाले. ते शूर होते, तितकेच दयाळू होते. ते जितके स्वाभिमानी होते, तितकेच ते विनयशील होते.
ते गरीबांप्रती अत्यंत संवेदनशील होते, परंतु क्रूर आणि निर्दयी शत्रूंसाठी ते कठोर आणि महापराक्रमी होते. शिवाजीराजांचा इतिहास जसा ढाल-तलवारींच्या लढायांचा आहे, तसाच त्यांनी आदर्श राज्यकारभार केला व नियोजनबद्ध प्रशासनव्यवस्था निर्माण केली. त्यांचे राज्य केवळ एका घराण्याचे किंवा समूहाचे नव्हते, तर ते रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते. त्यांचा इतिहास आणि कर्तृत्व केवळ एका पंथापुरते, राज्यापुरते किंवा देशापुरते मर्यादित नाही. त्यांचे कार्यकर्तृत्व वैश्विक पातळीवरचे आहे. त्यांच्या कार्याची, शौर्याची आणि उच्च कोटीतील नैतिकतेची तुलना समकालीन परकीयांनी जागतिक स्तरावर केलेली आहे.