

Telangana Municipal Election Results
esakal
एम. एन. एस. कुमार
तेलंगणमध्ये नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक महापालिका-नगरपालिकांमध्ये बहुमत मिळविले असून, सर्वाधिक नगरसेवकही निवडून आणले आहेत. उत्तर तेलंगणमधील काही भागांत भाजपचा प्रभाव दिसून आला असून, भारत राष्ट्र समितीसाठी (बीआरएस) मर्यादित यश चिंतेत टाकणारे आहे.
तेलंगणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका आणि नगरपालिका) निवडणुकांचे निकाल लागले. हे निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरते मर्यादित नाहीत, तर राज्याच्या राजकारणाची भावी दिशा दाखविणारा आहे. या निकालांमध्ये काँग्रेसचा निर्विवाद प्रभाव दिसून आला. त्यामुळे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी तेलंगणच्या राजकारणाचा निर्विवाद केंद्रबिंदू झाले आहेत. सत्ताधारी काँग्रेसने शहरी मतदारांमध्ये आपली पकड घट्ट केली असली, तरी काही ठिकाणी झालेली त्रिशंकू स्थिती आणि काही ठिकाणी झालेल्या भाजपच्या विजयाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने रेवंत रेड्डी यांचे कौतुक केले असून, ते करिश्माई नेते म्हणून समोर आले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांनी या विजयाचे वर्णन ‘पीपल्स गव्हर्नन्स’ असे केले आहे. प्रियांका गांधी यांनी वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांच्या कुशल रणनीतीचे कौतुक केले. त्यांच्या रणनीतीमुळेच शहरी भागातही काँग्रेस मजबूत झाल्याचे दिसत आहे. दिल्लीत रेवंत रेड्डी यांचे वजन वाढल्याचा थेट परिणाम आगामी काळात राज्याचा अर्थसंकल्प आणि विकास प्रकल्पांवर दिसून येईल.