

Climate Change and Monsoon
esakal
लेखक - सुदर्शन कुडचे
गेल्या काही वर्षांत भारतासह संपूर्ण जगाला हवामानातील मोठ्या बदलांचा अनुभव येत आहे. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दीर्घकालीन दुष्काळ आणि वाढत्या नैसर्गिक आपत्ती यांचा परिणाम सर्वाधिक शेती क्षेत्रावर होत आहे. भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक शेती आजही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनमधील कोणताही बदल थेट अन्नसुरक्षा, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. म्हणूनच हवामान बदल आणि मान्सून यांचा परस्परसंबंध समजून घेणे अत्यंत आहे.
भारतीय मान्सून हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. भारताच्या वार्षिक पावसापैकी सुमारे सत्तर टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. मात्र, हवामान बदलामुळे मान्सूनचे आगमन, माघार आणि पावसाचे वितरण अधिक अनिश्चित होत आहे. काही भागांमध्ये कमी कालावधीत अतिवृष्टी होत आहे, तर काही भागांमध्ये दीर्घकाळ पाऊसच पडत नाही. त्यामुळे शेतीचे नियोजन अधिक कठीण होत चालले आहे.
अनियमित पावसाचा सर्वाधिक फटका खरीप हंगामाला बसत आहे. पेरणीनंतर पाऊस खंडित झाल्यास बियाणे वाया जातात, तर काढणीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे उभे पीक नष्ट होते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असून उत्पन्नात मोठी घट होत आहे.