

Marathi Cinema History
esakal
दादा कोंडके एक सच्चे चित्रपटप्रेमी होते. त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. प्रेक्षकांनी नेहमी त्यांची विनोदी बाजू बघितली; पण त्यांच्या तोंडावर हसू आणणारे दादा तितकेच शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते. आम्ही लहान असताना दादांच्या शिस्तीला फार घाबरायचो. दादांना शाहीर व्हायचं होतं. ते त्यांचं स्वप्न होतं; पण त्यासाठी गायकांची आवश्यकता होती. त्यांचा मेहनताना देण्याइतके पैसे त्यांच्याकडे नव्हते म्हणून त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात आलं नाही. मग ते मला व माझ्या मोठ्या भावाला गाणं शिकवायचे. गाणं गाताना काही चूक झाली, की आम्हाला चांगलेच फटके द्यायचे. म्हणूनच आम्ही दोघंही गाणं गायला शिकलो. आम्ही दादांना आप्पा म्हणायचो. मला अजूनही आठवतंय, दादांनी आम्हाला पहिलं गाणं शिकवलं होतं ते म्हणजे ‘गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा’... तेव्हा दादा दादरमधील ‘अपना बाजार’मध्ये सेल्समन म्हणून कामाला होते. त्या वेळी त्यांनी हौशी कामगार कलाकारांचा एक ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमध्ये ते छोटी छोटी नाटकं बसवायचे.
त्याच वेळेस त्यांचे नायगाव-भोईवाडामध्ये जनता कलापथक होते. त्या पथकात त्यांनी एक बॅण्ड पथक तयार केले होते. त्या पथकातर्फे असे विविध प्रकारचे कार्यक्रम केले जात असत. एके दिवशी एका दिवाळी अंकात दादांच्या वाचनात एक कथा आली. त्या कथेचं नाव होतं, ‘खणखणपूरचा राजा.’ त्याचे लेखक होते, वसंत सबनीस. त्या काळी वसंत सबनीस सचिवालयात पब्लिसिटी विभागात कामाला होते.