

Dharur Fort History
esakal
बीड-लातूर महामार्गावर बीडपासून सुमारे ७० किमी अंतरावर ऐतिहासिक धारूर गड आहे. धारूरचा दुर्ग समोरून भुईकोट आहे; तर उर्वरित तीन बाजूंनी त्याला डोंगरदऱ्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे तो मिश्रदुर्ग आहे. अशा प्रकारचा तो महाराष्ट्रातील एकमेव दुर्ग आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा वैभवशाली इतिहास मराठवाड्याला लाभला आहे. भारतातील १६ जनपदांपैकी दक्षिणेकडील एकमेव जनपद मराठवाड्यात होते. त्याचे नाव आहे, अश्मक जनपद. प्राचीन काळात मराठवाड्यातील प्रतिष्ठान, भोगवर्धन (भोकर), तगर (तेर), नांदेड ही जगविख्यात गावे होती. प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी होती. ते एक महत्त्वाचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र होतेे. मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत बहिणाबाई (शिऊरकर), संत गोरोबा काका इत्यादी संत-महंत मराठवाड्यातील आहेत. मराठवाडा ही महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ चक्रधरांची कर्मभूमी आहे. राष्ट्रकुट, चालुक्य, यादव, भोसले यांनी आपल्या कार्याची सुरुवात मराठवाड्यातूनच केली. अजंठा, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी... वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास मंदिर मराठवाड्यातच आहे. मराठवाड्यातील लोक कष्टाळू, प्रतिभावान आणि माणुसकी जपणारे आहेत. मराठीतील आद्य चरित्र ‘लीळाचरित्रा’चे रचनाकार नागदेवाचार्य मराठवाड्यातीलच आहेत. मराठवाड्यात पाण्याचा, पावसाचा दुष्काळ आहे; परंतु सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा आणि गुणवत्तेचा दुष्काळ कधीही पडला नाही. मराठवाड्यात देवगिरीसारखा जगविख्यात गिरीदुर्ग आहे. तसेच नळदुर्ग, कंधार, औसा, परंडा, धारूर इत्यादी भुईकोट दुर्गदेखील आहेत. त्यांना सांस्कृतिक आणि संघर्षाचा इतिहास आहे.