

Social Media Impact
esakal
निरंजन आगाशे
नवमाध्यमांमुळे आपल्या आहार-विहार, विचार, आचार आणि उच्चार स्वातंत्र्याचा संकोच होतोय का, याचा विचार करायला हवा. या आणि इतरही अशा प्रश्नांना सामोरे जाण्याचा आजचा दिवस. वेगवेगळ्या ‘बेड्यां’तून मुक्तीचा निर्धार करण्याची हीच वेळ आहे.
आपण स्वतंत्र आहोत, म्हणजे नेमके काय, या प्रश्नावर विचार करण्यासाठी आजच्या इतका योग्य मुहूर्त दुसरा नाही. परकी राजवटीला येथून घालविण्यासाठी जवळजवळ शतकभर चाललेल्या सर्वव्यापी लढ्याचे, त्यातील सर्वोच्च त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा हा दिवस आहेच; परंतु त्याचबरोबर आपले स्वातंत्र्य जपण्याचा, ते अधिकाधिक अर्थपूर्ण करण्याचा संकल्पही या दिवशी करायला हवा. त्यासाठी आजच्या काळात नेमक्या कोणकोणत्या बेड्या आपल्याला जखडून ठेवत आहेत किंवा ठेवू पाहात आहेत, याचा विचार मग ओघानेच येतो.
स्वातंत्र्योत्तर काळात; विशेषतः नव्वदनंतर देशाने विविध क्षेत्रांत जो विकास केला, त्यातून मोठ्या प्रमाणात दारिद्र्याच्या खाईतून मोठ्या लोकसंख्येला बाहेर काढण्यात आपण यशस्वी झालो. मध्यमवर्गाचा विस्तार झाला, ही चांगलीच गोष्ट झाली. ‘नवमध्यमवर्ग’ उदयाला आला. तंत्रविज्ञानाच्या सर्वंकष प्रभावाच्या काळात हा वर्ग ‘नव-माध्यमवर्ग’ही बनला आहे. खरे तर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वेगवान वाटचालीच्या या काळात नवमाध्यमे व्यक्तीच्या सक्षमीकरणाचे उत्तम साधन ठरू शकतात; पण त्यासाठी ती कशी वापरायची याचा विवेक जागा ठेवावा लागतो, तशी वृत्ती अंगी बाणवावी लागते.