

Marathi Experimental Theater and Literature
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
‘झुलवा ? उत्तम बंडू तुपे यांची कादंबरी…?’ मी.
‘हो… त्याच्यावरचं नाटक मी पुन्हा करतोय, तुला त्यात काम करायचंय… वाचून ठेव. निवांत बोलूच. ऐक, त्यातली परसूची भूमिका तुला करायचीय.’ वामन केंद्रेसरांनी फोन ठेवला.
परसू…?
वामन केंद्रेसरांसोबत जेव्हा मी फुलराणी या नाटकात काम करत असे, तेव्हा त्यांच्या बोलण्यात ‘झुलवा’ या नाटकाचा उल्लेख वारंवार होई. त्या नाटकाच्या आठवणी सांगताना ते रमून जात. वामन केंद्रे आणि झुलवा हे नाटक समानार्थी शब्दच जणू इतकं एकात्म होतं…
त्या चर्चांमध्ये परसू या भूमिकेबद्दल बोललं जायचं. त्यावर विविध अंगांनी चर्चा होत असे. त्या वेळी वाटायचं की भूमिका आपल्याला करायला मिळाली तर…? पण वामन केंद्रे पुन्हा झुलवा करतील का ? किंवा आपल्याला ते करायला जमेल का ? असे एक वा अनेक सवाल गर्दी करत… आणि त्या दिवशीचा फोन, तुला परसूची भूमिका करायचीय…
त्या भूमिकेला स्वत: वामनसरांची माझ्यापर्यंत आणून ठेवलं. एकदम फिल्मी डायलॉग आठवला, ‘किसी चिज को शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात उसे तुम्हे मिलाने की कोशिश में लगा जाती है.’ इथं स्वत: नाटकाचे दिग्दर्शकच ती संधी माझ्यासाठी घेऊन आले होते.
नगरच्या प्रभाकर पुस्तकालयातून झुलवा या कादंबरीची एक बरीच जुनी प्रत हाती लागली. एकाच टप्प्यात सलग वाचून काढली. सुटलंच नाही हातातून… दोन अडीच तासांत कादंबरी हातावेगळी झाली… एक जखमी जगणं त्या शहात्तर पानांत भळभळत होतं, हळहळत होतं. उत्तम बंडू तुपे यांनी त्या आवेगाला शहात्तर (७६) पानांत आवरलं होतं. बांधलं होतं, तरी ते फुटून बाहेर येऊ पाहत होतं. त्यात वेदना हुंकारत होती. हिसडे मारून बाहेर येऊ पाहत होती. फुटून लाव्हा बाहेर फेकू पाहत होती. पुस्तकाच्या पानांना झुगारून गळाभर मुक्तीचं गीत गाऊ पाहत होती. निद्रिस्त समाजाचे कान भेदू पाहत होती. पण परिस्थितीचा विळखा अति घट्ट, दगडी चिरेबंदी… जातीचा त्याहून पाषाणी… त्यामुळे साखळ्या घट्ट होतात, खांद्यातलं बळ गळून पडतं. जगनीची प्रकाशाची अट अडकली जाते. तिची आई येलू अधांतरी तरंगत भिरभिरते… परसू जगण्याला काहीच उद्देश नाही, म्हणून परंपरेच्या थोतांडाना मिठी मारत बसतो, नाहक कुरवाळत बसतो. दगडधोंड्यांना, परडीला स्वत:ला अर्पण करतो. पण उत्तम बंडू तुपे यांची जगनी परामत मान्य करत नाही. ती क्षितिजापल्याडच्या सूर्याला हाक मारते. तो ओ देऊन उगवतोही. तांबूस उगवतीचा प्रकाश सर्वदूर पसरतो. याचकानं मदतीसाठी, सुटकेसाठी हाक द्यावी आणि त्या प्रभाकरानं ओ द्यावी. अरुणोदयाचा उत्सवच तोही अशी कादंबरी… त्याचं नाटक खरं तर रंगावृत्ती चेतन दातारनं केली होती…