

डॉ. श्रीनाथ कवडे
सह्याद्री पर्वतरांगा हा जैवविविधतेने नटलेला अत्यंत महत्त्वपूर्ण भूभाग आहे. येथील परिपूर्ण अधिवास अनेक दुर्मीळ आणि धोकाग्रस्त प्राणी प्रजातींसाठी व वनस्पतींसाठी जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे याठिकाणाला जागतिक स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेष म्हणजे या भागातील ३९ ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. इथल्या राखीव जंगलांत असलेला अत्यंत महत्त्वपूर्ण वनस्पतींचा खजिना जगासाठी महत्त्वाचा आहे हे यावरून सिद्ध होते.
‘देवराई’ अर्थात देवासाठी राखलेले जंगल अथवा राई. राखीव जंगलांइतक्याच महत्त्वपूर्ण असणाऱ्या या राया मानवाने देवावरील श्रद्धेपोटी जपलेल्या आहेत. सह्याद्रीबरोबरच कोकणपट्टादेखील तितकाच महत्त्वपूर्ण भूभाग असून इथले वैशिष्ट्यपूर्ण ‘सडे’ आपले वेगळेपण टिकवून आहेत.