

Stress management for IT professionals
esakal
आयटी क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत चाललेले ताणतणाव आता गंभीर स्वरूप धारण करत चालले आहेत. सकाळी लवकर जायचं, रात्री उशिरापर्यंत थांबायचं, डेडलाइन्सचा ताण, एआय तंत्रज्ञानामुळे स्वतःला सतत अपडेट ठेवायला लागणं, सकाळ ते रात्री उशिरापर्यंत काम करावं लागणं, पुढे जाण्यासाठीची जीवघेणी धडपड आणि त्यासाठी प्रसंगी तब्येतीची आणि निकोप नात्यांमधली हेळसांड हे विलक्षण दुष्टचक्र आहे.
हे आवश्यक म्हणायचं की अपरिहार्य, हा गंभीर प्रश्न झालाय. यात कोवळे तरुण भरडले जातायत. कर्तृत्वाची शिखरं पादाक्रांत करताना ‘आतला’ मी आनंदी, स्वस्थ, कणखर राहणं खूप महत्त्वाचं असतं, आणि प्रयत्नांनी ते शक्य आहे.
सुजय माझ्या मित्राचा मुलगा. देखणा, हुशार. कॉम्प्युटर इंजिनिअर. त्याची पत्नी अर्पिता गोड, सालस मुलगी. तीही कॉम्प्युटर इंजिनिअर. सुजय आणि अर्पिता एक हसतमुख, खेळकर जोडपं. दोघेही आयटी कंपन्यांमध्ये, पुण्यात हिंजवडीला काम करणारे. वर्षाभरापूर्वीच लग्न झालेलं. भरपूर पगार, स्वतंत्र कार्स. वेल फर्निश्ड सोयीसुविधांनी सुसज्ज घर. दोघांचेही परदेश दौरे झालेले. सगळं कसं अगदी दृष्ट लागण्यासारखं. आणि खरोखरच अचानक दृष्ट लागावी तसं घडलं. वर्षभरापूर्वी त्यांच्या लग्नात दोघांनाही पाहिलं होतं. उत्साहानं ओसंडून वाहणारी प्रसन्न अशी ती व्यक्तिमत्त्वं होती, आणि आज माझ्यासमोर बसलेला सुजय विलक्षण थकलेला, निरुत्साही दिसत होता. अर्पिताही विलक्षण थकल्यासारखी वाटत होती. मी नीट न्याहाळत होतो. काहीतरी घडलं होतं हे निश्चित. शेवटी अर्पितानं कोंडी फोडली. ‘‘सर, सध्या आम्हाला दोघांनाही प्रचंड अस्वस्थ वाटतंय.