

Farmer to Consumer Direct Sale
esakal
आज आम्ही इतकंच सांगतो, की शेतकरी फक्त उत्पादन करणारा राहिला, तर तो कायम बाजाराच्या दयेवर जगत राहील; पण ज्या दिवशी शेतकरी स्वतः उत्पादन करेल, त्यावर प्रक्रिया करेल आणि थेट ग्राहकांपर्यंत विकेल त्या दिवशी त्याच्या हातात केवळ पैसा नाही, तर निर्णयाची ताकद येईल.
कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता चौपटीने घ्यावे... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे शेतकऱ्याची किती पिळवणूक-फसवणूक होते हे आपण सर्व जण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत... आम्ही जेव्हा निवडक कार्यकर्ते आणि सहकारी मित्रांसह विविध भागांत अभ्यास दौरे करत होतो, तेव्हा एक गोष्ट अगदी ठामपणे आमच्या लक्षात आली ती म्हणजे, फक्त शेतीमाल उत्पादन करून विकास होत नाही, तर त्या मालावर प्रक्रिया केली तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय मिळतो.
आम्ही अनेक ठिकाणी प्रक्रिया उद्योगांची उत्कृष्ट मॉडेल्स पाहिली. गावागावात उभे राहिलेले छोटे-छोटे उद्योग - स्थानिक शेतीमालावर ती आधारित होती. तेव्हा आम्हाला समजलं, की प्रक्रिया म्हणजेच शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळवून देणारी ताकद आहे.