

Geopolitical Shifts in Europe
esakal
श्रीराम कुंटे - saptrang@esakal.com
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला भारत, चीन आणि अरब देश जगाचं सांस्कृतिक आणि आर्थिक नेतृत्व करत होते. अंधश्रद्धा आणि रोगराईचा सुळसुळाट असणारा युरोप कोणाच्याही खिजगणतीतही नव्हता. पण अनेकदा दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांचा परस्परसंबंध कल्पनेपेक्षाही अद्भुत असतो. चौदाव्या शतकाच्या मध्यावर दूरच्या मंगोलियातून प्लेगचा उगम झाला. हाच प्लेग तत्कालीन सिल्क रूट द्वारे युरोपात आला. अवघ्या ७-८ वर्षांत युरोपची लोकसंख्या निम्मी झाली. समाजाची संपूर्ण नव्याने रचना करायची संधी मिळालेल्या युरोपमध्ये एकामागोमाग एक गोष्टी घडत गेल्या आणि रेनेसाँ झाला. त्यानंतर पुढची पाचशे वर्षे युरोपने जगाचं आर्थिक आणि सांस्कृतिक नेतृत्व केलं. जगाच्या राजकीय तत्त्वज्ञानात मूलभूत बदल घडवण्याबरोबरच जगाला कला आणि सौंदर्यदृष्टी दिली.
आपला विषय भू-राजकारण असल्याने आपण फक्त युरोपने भू-राजकारणात केलेल्या बदलांवर लक्ष केंद्रित करू या. रेनेसाँ नंतर तंत्रज्ञान बदललं. त्यामुळे भू-राजकीय स्पर्धेच्या स्वरूपात तीन मोठी स्थित्यंतरं झाली. पहिलं म्हणजे युरोपचं समुद्राशी बदललेलं नातं. भारतीय, चिनी आणि अरबी समुद्राचा वापर फक्त व्यापारासाठी करत असताना युरोपने त्याचा उपयोग भू-राजकीय ताकद वाढवण्यासाठी केला. पोर्तुगीजांनी संपूर्ण हिंदी महासागरात मोक्याच्या जागी ठाणे उभारून इतर देशांच्या जहाजांकडून जबरदस्तीने कर गोळा करायला सुरुवात केली. पुढे फ्रेंच, ब्रिटिश, डच यांनी पोर्तुगीजांच्या पावलावर पाऊल ठेवलं. त्यामुळे ज्या देशाचा भूप्रदेश मोठा तो शक्तिशाली हे गृहीतक बदललं. दुसरं कारण म्हणजे भू-राजकारणासाठी आधी भू-प्रदेश आणि मग व्यापारी मार्ग महत्त्वाचे होते. पण आता ती जागा कच्च्या मालाने घेतली. युरोपमधल्या औद्योगिकीकरणानंतर चोवीस तास चालणाऱ्या कारखान्यांना कच्चा माल आणि तयार मालाला बाजारपेठ पुरवण्यासाठी वसाहतींची गरज भासू लागली. ती पूर्ण करण्यासाठी एकोणिसाव्या शतकात युरोपच्या वसाहतींचा विस्तार सर्वांत जास्त वेगाने झाला. भू-राजकारणाचं स्वरूप बदलणारं तिसरं कारण म्हणजे कोळशाची जागा तेलाने घेतली. दुसऱ्या महायुद्धात जपानने फ्रेंच इंडोचायना (म्हणजे आजचे व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया) वर आणि चीनवर हल्ला सुरू केल्यावर अमेरिकेने जपानचा तेलपुरवठा थांबवला. कोंडी झालेल्या जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला. जर्मनीने रशियावर हल्ला केला कारण तिला रशियाच्या बाकू इथल्या तेलविहिरी ताब्यात घ्यायच्या होत्या. आजही जागतिक भू-राजकारणात तेलाची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे, हे अनेक संघर्षांमधून आपल्याला दिसून येतं. भू-राजकारणात झालेल्या या तीन प्रमुख स्थित्यंतरांमुळे युरोपची भू-राजकीय ताकद प्रचंड वाढली. बदलत्या जगात अर्थातच अनेक देशांनी युरोपसारखंच औद्योगिकीकरण केल्याने युरोपचं भू-राजकीय वर्चस्व कमी झालं.