

global warming impact 2050
esakal
औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील तापमानापेक्षा तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पोहोचल्यास २०५० पर्यंत जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला अतिउष्णतेचा फटका बसेल. ऑक्सफर्डमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
जागतिक तापमानवाढ ही मानवाच्या बेपर्वाईतून निर्माण झालेली, पण संपूर्ण पृथ्वीला वेढणारी गंभीर समस्या आहे. औद्योगिकीकरणाच्या अतिरेकामुळे, जीवाश्म इंधनांच्या मोठ्या प्रमाणावर वापरामुळे, जंगलांच्या निर्दयपणे केलेल्या तोडणीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. कार्बन डायऑक्साइड, मिथेन यांसारखे हरितगृह वायू पृथ्वीभोवती अदृश्य आवरण निर्माण करून उष्णता अडवून धरतात. परिणामी पृथ्वीचे तापमान हळूहळू पण सातत्याने वाढत असून, त्याचे भयावह परिणाम मानवाला आज प्रकर्षाने जाणवत आहेत. वितळणाऱ्या हिमनद्या, वाढती समुद्रसपाटी, अनिश्चित ऋतूचक्र, दुष्काळ व महापूर हे सारे या तापमानवाढीचेच धोक्याचे इशारे आहेत.