
एवढी मोठी चूक झाल्यानंतर वैमानिक साधारण चर्चा करणार नाहीत. त्यांची प्रतिक्रिया वेगळ्या स्वरूपाची आली असेल. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यानंतर पायलटने को-पायलटला सांगितले असेल, की मी विमानावर नियंत्रण मिळवतो. तू इमर्जन्सी घोषित कर, ‘मेडे’चा कॉल दे... हे सगळे विषय अधांतरी आहेत...
लंडनला जाणारे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही सेकंदांतच अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २६० जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, विमान अपघात तपास विभागाने (एएआयबी) जाहीर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात संबंधित विमानाचे फ्युएल कंट्रोल स्वीच उड्डाणानंतर काही सेकंदांत ‘रन’ स्थितीतून ‘कटऑफ’ स्थितीत गेले असे म्हटले होते. त्यावर वैमानिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. साहजिकच त्याबाबत भाष्य करणे क्रमप्राप्त आहे.
अहमदाबादमधील अपघातानंतर ‘एएआयबी’ने जाहीर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात एक प्रकारे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचे फ्युएल कंट्रोल स्वीच उड्डाणानंतर काही सेकंदांतच ‘रन’ स्थितीतून ‘कटऑफ’ स्थितीत गेले असे म्हटले होते. त्यात मानवी चुकीचा उल्लेख होता. संबंधित दुर्घटनेत वैमानिकांची चूक आहे, असे म्हणता येणार नाही. कारण त्यांच्यात संवाद खूप कमी झाला. त्यातच बोईंग कंपनीची एक सवय आहे. ते चूक न स्वीकारता वैमानिकावर खापर फोडतात.