

कोणे एके काळी भाषा नव्हती. कुणीतरी गाणे गुणगुणले आणि भाषा निर्माण झाली. कोणी एके काळी अग्नी नव्हता. माणसांनी दगड घासले आणि अग्नी जन्माला आला. कोणी एके काळी मालमत्ता नव्हती. एका माणसाने रेषा ओढली आणि म्हटले, ‘ही बाजू माझी,’ आणि मालकी हक्क सुरू झाले.
बुद्धिमत्ता काहीतरी आधीच अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून तयार होत नाही; ती शून्यातून जन्मते. अग्नी, भाषा, मालकी हक्क या सगळ्या कल्पना माणसाच्या मेंदूत कुठल्याही नियमांशिवाय, माहितीशिवाय निर्माण झाल्या. आज आपण मानतो की कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रचंड डेटासेट्स, वैज्ञानिक नियम, आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ (LLMs) यावर आधारित आहे. अमेरिकेने ‘चॅट जीपीटी’ बनवले, चीनने ‘डीपसीक’. भारतासह अनेक आशियायी देश या शर्यतीत उतरले. पण ही स्थिती फार काळ टिकणारी नाही. गुगलने ‘ऑटो-एमएल झिरो’ नावाचे नवे ‘एआय’ मॉडेल तयार केले आहे.
हे ‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीपसीक’पेक्षा वेगळ्या स्तरावर आहे. याला LLMs ची गरजच नाही. ते स्वतःच्या चुकांमधून शिकत, नवे नियम तयार करते. माणसांनी आधी तयार केलेल्या गणिती ज्ञानाशिवाय हे साध्य होते. ‘ऑटो-एमएल झिरो’ अगदी नव्याने ‘अल्गोरिदम’ तयार करते; तेही मानवी मदतीशिवाय. आतापर्यंत त्याला काही मर्यादा आहेत. श्रीनिवास रामानुजन यांच्या सारख्या मूळ गणितीय प्रमेयांची कल्पना करण्यास ते अद्याप सक्षम नाही. परंतु ही इतिहासात, निसर्गात किंवा मानवी ज्ञानात अस्तित्वात नाही अशा एका नवीन प्रकारच्या बुद्धिमत्तेची पहाट आहे.