

History of Reading
esakal
रिता राममूर्ती गुप्ता - info@reetaramamurthygupta.in
प्रिय वाचकहो, माझ्या ‘वाचाल तर वाचाल’ सदराला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार. वाचन ही मानवाने निर्माण केलेल्या सर्वांत प्रभावी बौद्धिक साधनांपैकी एक देणगी आहे. ते विकसित होण्यासाठी मानवजातीला हजारो वर्षांचा प्रवास करावा लागला आणि समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पिढ्या गेल्या. मात्र आजच्या विचलित करणाऱ्या काळात आपण वाचनातून मिळणारे त्याचे सर्वांत मौल्यवान लाभ गमावण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत.
बोलणे ही मानवाची नैसर्गिक क्षमता आहे; परंतु वाचन तशी प्रक्रिया नाही. आपल्या मेंदूची उत्क्रांती बोलण्यासाठी, पाहण्यासाठी आणि सामाजिक संवाद साधण्यासाठी झाली. लेखनपद्धती मात्र नंतर विकसित झाल्या. त्यामुळे वाचण्याची क्षमता आत्मसात करताना मेंदूला आधीपासून अस्तित्वात असलेल्या मज्जासंस्थेच्या जाळ्यांचा नव्या पद्धतीने वापर करावा लागला.
सुरुवातीच्या काळात मानवाने व्यापार, कायदे आणि कथा यांची नोंद ठेवण्यासाठी चित्रे, खुणा आणि विविध चिन्हांचा आधार घेतला. कालांतराने या चिन्हांचे रूपांतर लिपी आणि वर्णमालेत झाले. त्यामुळे भाषेचे अधिक अचूक, सुसंगत आणि व्यापक प्रतिनिधित्व करणे शक्य झाले.
जेव्हा मुले वाचन शिकतात, तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये अक्षरशः नव्या जोडण्या तयार होतात. दृष्टीशी संबंधित भाग भाषा समजणाऱ्या भागांशी जोडले जातात. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अधिक विकसित होते आणि गुंतागुंतीचे विचार व संकल्पना समजून घेण्याची ताकद वाढते. सखोल वाचन (दीर्घकाळ एकाग्रतेने केलेले वाचन) हे मनासाठी एक प्रकारचा व्यायामच आहे. ते एकाग्रता, कल्पनाशक्ती, सहानुभूती आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित करते.