Human-Centered Development
esakal
सुहास भस्मे - sakal.avtaran@gmail.com
विकास हा लोककेंद्रित आणि पर्यावरणकेंद्री असावा. अधिक चांगले व परवडणारे शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देऊन मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर आपण असे करण्यात अपयशी ठरलो, तर ‘भांडवलशाही विकास’ नावाचा आधुनिक बकासुर आपली मानवी मूल्ये आणि आपले सुंदर पर्यावरण यांतील सर्व काही गिळून टाकेल.
‘विकास’ म्हटले की डोळ्यांसमोर उभ्या राहतात उंच इमारती, रुंद रस्ते, वाढती अर्थव्यवस्था आणि आधुनिकतेची चिन्हे; पण विकासाच्या प्रवासात माणूस आणि निसर्ग नेमके कुठे उभे आहेत? नुकत्याच झालेल्या एका परिषदेत विकासाच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेने अशाच काही मूलभूत प्रश्नांना उजाळा दिला. मानवी हिताकडे दुर्लक्ष करून भूतकाळात आणि वर्तमानात झालेल्या अनियंत्रित विकासामुळे व्यक्तींचे रूपांतर भांडवलशाही विकासाच्या विशाल यंत्रणेतील केवळ एका घटकात झाले आहे. या प्रक्रियेमुळे मानवी अस्तित्वाचे आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे सौंदर्य कमी झाले आहे.
मानव म्हणून आपण व्यक्ती, समूह किंवा राष्ट्र या नात्याने इतरांच्या तुलनेत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कुठे आहोत, हे जाणून घेण्यात नेहमीच उत्सुक असतो. प्रगतीचे वारंवार मूल्यमापन करताना, इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपली कामगिरी तपासण्यासाठी आपण विविध संज्ञांचा वापर केला आहे. सुरुवातीला, १९६०च्या दशकात, एखाद्या देशाच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी ‘आर्थिक वृद्धी’ (economic growth) ही संज्ञा वापरली जात असे. इतर देशांच्या तुलनेत स्वतःचे स्थान उंचावण्यासाठी देशाचे ‘स्थूल देशांतर्गत उत्पादन’ (जीडीपी) आणि ‘दरडोई उत्पन्न’ वाढवणे हेच मुख्य निकष मानण्यावर या संकल्पनेत भर दिला जात असे. जीडीपीचा निकष म्हणून वापर करणे हा एक संख्यात्मक दृष्टिकोन होता. त्यात अनेकदा लोक आणि देशाच्या जीडीपी वृद्धीमध्ये त्यांचे असलेले योगदान यांकडे दुर्लक्ष केले जात असे. लोकांमध्ये असलेली विषमता आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा या बाबींवर ही संकल्पना मौन बाळगत असे.