

Solar panels in a sunny field powering a rural house.
esakal
अशोक पेंडसे - saptrang@esakal.com
ऊर्जानिर्मितीच्या बाबतीत राज्यात आणि देशात सौरऊर्जा निर्मिती वाढत आहे. या वर्षी याच ऊर्जेमुळे वीजकपातीचे संकट ओढवले नाही. कसे साध्य झाले, ही वीजनिर्मिती वाढवता येईल का, याचे फायदे काय आणि त्यातल्या अडचणी कशा स्वरूपाच्या आहेत याचा ऊहापोह...
मानवी आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत, यात चौथी सर्वांत महत्त्वाची गरज म्हणजे वीज, अर्थातच ऊर्जा याचा समावेश करायला हवा. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण वीज वापरतो मात्र त्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि त्याच्या वापरण्याच्या वेळाही वेगळ्या वेगळ्या असतात, म्हणजे आपण घरात जेव्हा फ्रीज वापरतो त्यासाठी आपल्याला चोवीस तास विजेची गरज असते, मात्र प्रकाश देणारा दिवा आपल्याला सर्वसाधारणपणे सायंकाळनंतर लागतो. त्याचवेळी हवेसाठी वापरला जाणारा पंखा उन्हाळ्याच्या दिवसांत, दिवसा व रात्रीही हवा असतोच. याचा अर्थ विजेची गरज वेगवेगळ्या काळात बदलत असते. आपण आपल्या विजेच्या गरजेचा विचार केल्यास दिवसाला आपली कमाल विजेची मागणी २८ हजार ते ३० हजार मेगावॉट आहे. मात्र आपली कमीत कमी मागणी १७ ते १८ हजार मेगावॉट असतेच. ही वीज अपुरी पडली, की आपल्याला लोडशेडिंगच्या संकटाला सामोरे जावे लागते, मात्र या वेळी प्रचंड उन्हाळा असूनही आपण वीजकपात अर्थात लोडशेडिंग टाळू शकलो. हे कशामुळे साध्य झाले? त्याचे उत्तर म्हणजे सौरऊर्जेमुळे. आपल्याला या वर्षी सर्वांत महत्त्वाची मदत झाली ती सौरऊर्जेची. आपल्या राज्याचे सौरऊर्जा निर्मितीचे ध्येय आहे ते १५ हजार मेगावॉट निर्मितीचे. त्यातले आपण सध्या साध्य केले ते पाच ते सहा हजार मेगावॉटचे. ही ऊर्जा आपण तयार करू शकलो ते केवळ सौरऊर्जेची निर्मिती केल्यामुळेच.