

India Eastward Relations
esakal
डॉ. पुलि ंद सामंत - sakal.avtaran@gmail.com
पश्चिमेकडील प्रभावांच्या छायेत अनेकदा दुर्लक्षित राहिलेला भारताचा पूर्वेकडील संबंधांचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि प्राचीन आहे. आग्नेय आशियापासून चीन, कोरिया आणि जपानपर्यंत भारतीय विचार, धर्म आणि संस्कृतीने शतकानुशतके आपला ठसा उमटवला आहे.
गेल्या लेखात आपण पूर्वाभिमुखतेचे पहिले पाऊल उचलले. पश्चिमेकडून सातत्याने झालेल्या आक्रमणामुळे भोगलेल्या त्रासातून निर्माण झालेल्या भयगंडामुळे भारत एका अर्थाने पश्चिमाभिमुख झाला होता. मात्र, कदाचित त्याच गंडातून जन्माला आलेल्या न्यूनगंडाने ग्रस्त होऊन स्वातंत्र्यानंतरही तसाच राहिला. त्याच्या त्या अवस्थेचे प्रमुख कारण म्हणजे प्रदीर्घ काळच्या दौर्बल्यातून झालेली आत्मविस्मृती, ज्यात अर्थातच आक्रमण-पूर्व समृद्ध इतिहासाचा समावेश होता, ज्याचा एक मोठा भाग त्याच्या पूर्वेशी असलेल्या परस्पर-पूरक अशा प्रदीर्घ परस्पर-संबंधांशी संबंधित होता. तो काळ कमीत कमी दीड हजार वर्षांएवढा प्रदीर्घ होता. यातला ‘कमीतकमी’ हा शब्द कळीचा आहे, जो जवळपास सर्वच इतिहासकारांनी वापरला; कालनिश्चितीसाठी ज्या पुरातत्त्व वा अभिलेखादी पुराव्यांचा आधार घेतला जातो ते त्यांना इसवी सन-पूर्व काळातले सापडले नाहीत म्हणून. परंतु, ही तांत्रिक बाब झाली.
यासंदर्भात भारतीय मान्यतेनुसार दोन ठळक घटना लक्षात घेणे आवश्यक आहे - सम्राट अशोक-संबंधी इतिहास आणि वाल्मीकी रामायण. अशोकाने, त्याच्या उत्तर-कार्यकाळात बौद्धमताच्या प्रसारासाठी दोन दूतांना - सोना आणि उत्तरा - ‘सुवर्णभूमी’कडे रवाना केले होते. सदर ‘सुवर्णभूमी’ म्हणजे भारताला खेटून असणारा आग्नेय आशियाई शेजारी ब्रह्मदेश (ऊर्फ बर्मा ऊर्फ म्यानमार) आणि त्याच्या दक्षिणेला खेटलेला श्याम (ऊर्फ सयाम ऊर्फ थायलंड) अभिप्रेत होते. या ‘सुवर्णभूमी’ प्रकरणाचा सविस्तर परामर्श आपण पुढे घेणारच आहोत. मात्र, उपरोक्त संदर्भात सांगायचे झाल्यास अशोकाच्या काळात म्हणजेच इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकात आग्नेय आशियाई खंडाचे अस्तित्व भारतीय जाणून होते आणि ते त्याला एका विशिष्ट नावाने ओळखतही होते.