

Fortified rice
esakal
कोट्यवधी कुपोषित नागरिकांचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या जगण्याला बळकटी यावी, यासाठी त्यांना चौरस व समतोल आहार मिळायला हवा. पण तो मिळत नाही, हे वास्तव लक्षात घेऊन स्वस्त धान्य दुकानात मिळणारा ‘ताकदीचा’ तांदूळपुरवठा केंद्र सरकारकडून तूर्त तरी थांबवण्यात आला आहे. त्याची मीमांसा.
गेल्या ७५ वर्षात देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढले. बंगालच्या दुष्काळात १९४२-४३ मध्ये लाखो नागरिक देशात भुकेने मरण पावले. १९४७ नंतर १९७०च्या दशकातील हरित क्रांतीनंतर सुदैवाने तशी नामुष्की पुन्हा आली नाही. या प्रगतीचे समाधान असताना, तांदूळ-गहू याचे विक्रमी उत्पादन देशात होत असताना व सरकारी वखार महामंडळाची गोदामे साठवणूकमर्यादा काठोकाठ गाठत असताना बहुसंख्य नागरिक दोन वेळा जेवू शकतात, हे नक्की. पण प्रश्न आहे तो ते काय जेवतात हा. आणि हेच खरे आव्हान आहे. ते घेत असलेले जेवण परिपूर्ण नाही. त्यांच्या रोजच्या खाण्यातील अन्नपदार्थ बरेचसे निकृष्ट किंबहुना अनेक चांगल्या पोषणघटकांचा भरपूर अभाव असलेले असे आहे. दोन वेळेला पोटभर भात-पोळी भाजी खाल्ली म्हणजे सकस जेवण घेतले, या समजुतीला छेद देणारे आहे. अनेकांच्या नेहमीच्या जेवणात प्रथिने, लोह, व अन्य पोषणघटक याचा समावेश फार अल्प आहे. हा निष्कर्ष अनेक वर्षे या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगत आहेत.
‘समतोल आहार’ किंवा ‘चौरस आहार’ हा शब्दप्रयोग रूढ आहे. केवळ भात, पोळी, भाकरी हे पुरेसे नाही, तर त्याच्याबरोबरीने पालेभाज्या, कडधान्य, डाळी,अंडी,दूध असे अन्न जर वर्षभर मिळाले तरच ती व्यक्ती सुपोषित आहे असे म्हणता येईल. महिला आणि बालके यांच्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्तच. या प्रश्नावरचे उत्तर म्हणून एक नवीन योजना आली.