

Indian Missile Technology
esakal
काशीनाथ देवधर - डीआरडीओतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ
भारताचे ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या ‘एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा’मुळे (आयजीएमडीपी) भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात अभूतपूर्व स्वयंपूर्णता मिळवली आहे. ‘पृथ्वी’, ‘अग्नी’पासून ते अद्ययावत ‘पिनाक’ प्रणाली आणि ‘मिशन शक्ती’पर्यंतचा हा प्रवास भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या ताकदीचा आणि जागतिक वर्चस्वाचा निर्विवाद पुरावा आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी १९८२ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हाती घेतलेल्या ‘एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा’चे (आयजीएमडीपी - IGMDP) यशस्वी नेतृत्व केले. या अंतर्गत पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग आणि अग्नी या पाच जागतिक दर्जाच्या क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात आला. या यशस्वी विकासानंतर डीआरडीओला भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारा तांत्रिक पाया आणि प्रचंड आत्मविश्वास मिळाला. याच तंत्रज्ञानाच्या बळावर २७ मार्च २०१९ रोजी भारताने ३०० किमी उंचीवरील कक्षेत असलेल्या आणि ७ ते १० किमी प्रतिसेकंद इतक्या प्रचंड वेगाने फिरणाऱ्या ‘मायक्रो सॅट-आर’ (Microsat-R) उपग्रहाला अचूकपणे खाली पाडले. ‘मिशन शक्ती’ नावाच्या या मोहिमेमुळे भारत हे तंत्रज्ञान विकसित करणारा जगातील चौथा देश बनला आणि जगाला दाखवून दिले की, ‘हम भी कुछ कम नहीं हैं.’