

India Ramsar Sites
esakal
लेखक : सुदर्शन कुडचे
जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य अर्थात सुरहा तल याला आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या आर्द्रभूमीचा दर्जा मिळाल्यानंतर भारतातील रामसर स्थळांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. या यशामुळे भारत आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे असलेला देश ठरला असून, जगातही अग्रगण्य देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
आर्द्रभूमींचे संवर्धन आणि शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी इराणमधील रामसर या शहरात एकोणीसशे एकाहत्तर साली आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला. या कराराला त्या शहराच्या नावावरून 'रामसर करार' असे संबोधले जाते. भारताने एकोणीसशे ब्याऐंशी साली या करारात सहभाग घेतला. या करारानुसार प्रत्येक सदस्य राष्ट्राने किमान एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आर्द्रभूमी घोषित करणे आवश्यक असते. आज जगभरातील हजारो आर्द्रभूमींना हा दर्जा प्राप्त झाला आहे.
आर्द्रभूमी म्हणजे वर्षभर किंवा वर्षातील काही काळ पाण्याने व्यापलेला भूभाग. तलाव, सरोवरे, दलदली, नदीमुखे, खारफुटी क्षेत्रे, किनारी भाग आणि मानवनिर्मित जलाशय यांचा त्यामध्ये समावेश होतो. या क्षेत्रांचा जैवविविधता, जलसुरक्षा, हवामान संतुलन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा उपयोग असतो.