
स्वातंत्र्याचा विजयोत्सव आणि फाळणीच्या जखमा अशा परिस्थितीत, स्थलांतरं, स्थित्यंतरं असा संभ्रमाचा, संघर्षाचा काळ अनुभवत भारतीय चित्रपटसृष्टीच्या क्षितिजावर एकेक तारा उदयास येत होता. कुणी स्वर, कुणी लेखणी, कुणी स्वप्नं, तर कुणी अपार वेदना घेऊन मुंबईची वाट धरत होता. भारतीय संगीत, कला, अभिनय, साहित्य, काव्य यांचं एक सुंदर चित्र रजतपटावर उमटत होतं. सिनेमाचं रूपदर्पण हजारो प्रतिबिंबांनी जणू भरून गेलं होतं... ‘लारालप्पा, लारालप्पा’च्या खेळकर गाण्यातून रावीचा प्रवाह हलकेच अरबी समुद्रात मिसळत होता...
चित्रपट निर्मिती संस्था, नव्हे मोठ्या संस्थानासारखं वैभव असणाऱ्या ‘प्रभात’, ‘बॉम्बे टॉकीज’ बंद पडत असताना राज कपूर, देव आनंदसारखे त्यावेळचे नवयुवक स्वतःचा स्टुडिओ, चित्रनिर्मिती संस्था थाटत होते, याचं नवल वाटत होतं. ‘स्टुडिओ सिस्टिम’ला हादरे बसत होते. कला, तंत्र, नवे विचार स्वातंत्र्यानंतर अक्षरशः उसळी मारून येत होते...