

Indian Education System
esakal
डॉ. नितीन करमळकर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भारताची शिक्षण व्यवस्था ही प्राचीन गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगापर्यंत अनेक स्थित्यंतरे पार करत विकसित झाली आहे. ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीचे पडसाद, स्वातंत्र्योत्तर काळातील धोरणात्मक बदल आणि आजच्या व्यवस्थेतील त्रुटी यातून मार्ग काढत आता ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ कडे देशाची वाटचाल सुरू आहे. भारताला खऱ्या अर्थाने ‘विकसित भारत’ बनवायचे असेल, तर शिक्षण व्यवस्थेतील मुळापासूनचे बदल, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यांवर प्रकाश टाकणारा हा अभ्यासपूर्ण लेख...
भारतातील शिक्षण व्यवस्था ही अत्यंत प्राचीन असून तिचा प्रवास गुरुकुल पद्धतीपासून सुरू होऊन ब्रिटिश काळ आणि स्वतंत्र भारताच्या आधुनिक शैक्षणिक धोरणापर्यंत विकसित झाला आहे. ‘सा विद्या या विमुक्तये’ या ध्येयवाक्यात प्राचीन ऋषीमुनींनी शिक्षणविषयक आपला दृष्टिकोन व्यक्त केला आहे. भारताच्या सभ्यतेच्या खुणा समजली जाणारी शिक्षण परंपरा काळानुसार गुरुकुल, मठ-विहार, मदरसा, औपनिवेशिक शाळा आणि आधुनिक महाविद्यालये व विद्यापीठे या विविध रूपांत विकसित झाली. प्राचीन शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर, चारित्र्य निर्माणावर आणि मूल्य संवर्धनावर भर दिला गेला आणि शिक्षण हे आत्मिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक उन्नतीचे माध्यम म्हणून गणले गेले. ज्ञान ग्रहण करणे, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, कृतज्ञ परायणता आणि चारित्र्य संवर्धन ही शिक्षणाची उद्दिष्टे गुरु-शिष्य संबंध, अनुभवाधिष्ठित व व्यावहारिक शिक्षण, मौखिक पद्धती इत्यादी माध्यमातून साधण्याचा प्रयत्न होता. वेद, उपनिषदे, दर्शनशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, संगीत, शिल्पकला, राज्यशास्त्र, कृषी इत्यादी विषयांचा समावेश हा अभ्यासक्रमाचा भाग होता. पूर्व वैदिक काळात जातीसंस्था परिदृढ नव्हत्या, म्हणूनच वडिलांचे नावही माहीत नसलेल्या सत्यकाम जाबालाचा हरिद्रुमत गौतम यांनी विद्यार्थी म्हणून स्वीकार केला. स्त्रियांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध होती; गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या विद्वान स्त्रियांचे सन्मानाने उल्लेख प्राचीन ग्रंथांत आले आहेत. बौद्ध काळात मठ आणि विहारांतून शिष्यांना धार्मिक आणि व्यावहारिक शिक्षण दिले जात असे. अकराव्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेली ही शिक्षण व्यवस्था सुलतानी आणि मुघल काळात मोडकळीस आली आणि हिंदू पाठशाळेबरोबरच फारसी आणि अरबी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या मदरसा व मकतब या संस्था उदयास आल्या.