

Four Waves of Indian Migration
esakal
डॉ. पुलिंद सामंत
आग्नेय आशियाच्या भारतीयीकरणामागे केवळ विचारांचे किंवा संस्कृतीचे स्थलांतर नव्हते; तर माणसेही स्थलांतरित झाली होती. वेगवेगळ्या काळात भारतातून गेलेल्या या प्रवाहांनी तिथल्या राज्यव्यवस्था, समाजजीवन आणि संस्कृतीवर ठसे उमटवले.
आग्नेय आशियाच्या ‘भारतीयीकरणा’ची चुणूक त्या भूभागातील देशांच्या, नद्या-पर्वतांच्या भारतीय नावांमधून आपण गेल्या लेखात पाहिली. अशी भारतीय भागाची नावे त्या भागात परस्पर तुलनेत कमी-अधिक प्रमाणात असंख्य आहेत, हे सांगितले तरी पुरे. वानगीदाखल काही अगदीच ठळक उदाहरणे इथे देऊन तो विषय आवरता घेऊ (प्रचलित अपभ्रंशित शब्द कंसात आहेत) ः मलेशियाची राजधानी पुत्रजय, इंडोनेशियाची राजधानी जयकृत (जयकर्ता, नंतर जाकार्ता), ब्रूनयची राजधानी बंदर श्री भगवान (बांदार सेरी बगावान). हाच प्रकार तिथल्या अनेक माणसांच्या (विशेषत: थाय आणि इंडोनेशियन) नावांच्या बाबतीतही आढळतो. त्यातली बरीच अर्थात अपभ्रंशित; पण काही आश्चर्यकारकरीत्या मूळ / शुद्ध स्वरूपातही आढळतात.