

India crude oil self-reliance
esakal
डॉ. अशोक कुडले, अर्थशास्त्राचे अभ्यासक
आजच्या घडीला कच्च्या तेलाशिवाय विकास साधणे जगातील कोणत्याही देशाला शक्य नाही आणि त्यामुळेच कच्च्या तेलाचा अखंडित पुरवठा ही भारताच्या विकासासाठीची सर्वांत मोठी गरज ठरली आहे. आता प्रश्न येतो की, आणखी किती काळ भारत कच्च्या तेलासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर देशांवर अवलंबून राहणार आहे?
कच्च्या तेलाची आयात करणारा भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा देश असून, देशाच्या एकूण गरजेच्या जवळपास ८९ टक्के कच्चे तेल आजमितीस आयात केले जात आहे. जगातील जवळपास सर्वच अर्थव्यवस्था या विकासासाठी कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत. गेल्या महिन्यापासून अमेरिका-इस्राईल व इराण या देशांमध्ये युद्ध भडकल्यामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक पातळीवरील एकूण निर्यातीपैकी आखाती देशांतून होणारी २८.२ टक्के निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. भारताची कच्च्या तेलाची आयात रशियाखेरीज मुख्यत्वे सौदी अरेबिया, यूएई, इराक, कुवेत या आखाती देशांकडून केली जाते, जी सद्यःस्थितीत स्फोटक युद्धाच्या तडाख्यात सापडलेल्या पर्शियन आखातातील होर्मूझ सामुद्रधुनीतून येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. त्यामुळे जवळपास ७० टक्के आयात आता होर्मुज सामुद्रधुनीच्या बाहेरून अटलांटिक समुद्रमार्गे केली जात असल्यामुळे वाहतूक खर्चातील वाढीमुळे भारतातील कच्चे तेल शुद्धीकरण उद्योगांपुढील अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत भारताची ऊर्जा गरज काहीशी संकटात सापडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नेमके इथेच भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पाच्या पूर्ततेची गरज अधोरेखित होत आहे.