

India vs Pakistan Cricket
esakal
सुनंदन लेले - sdlele3@gmail.com
पाकिस्तानसमोरच्या खेळीचे कौतुक होत असताना ईशान किशनकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. भारतीय संघातील वातावरण असे आहे, की सगळ्या खेळाडूंना समान वागणूक मिळते. चांगल्या लयीत खेळणाऱ्या खेळाडूंना पाठबळ मिळतेच; पण विशेषकरून जे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये वाटत नाहीत, त्यांची काळजी जास्त घेतली जाते. संपूर्ण संघाचे मनोबल चांगले राहावे, यासाठी प्रयत्न केले जातात. ईशान किशन त्याचेच एक उदाहरण आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्धचा विजयरथ जोमाने पुढे नेला असताना आजी-माजी खेळाडूंच्यात चर्चा फक्त ईशान किशनच्या खेळीची होती. टी-२० सामन्यात कोणी ७७ धावांची आक्रमक खेळी केली तर कौतुक होते; पण जास्त काही बोलबाला होत नाही. ईशान किशनच्या खेळीची चर्चा त्याने ज्या खेळपट्टीवर खेळी उभारली त्यावरून आहे. बाकीचे चांगले समजले जाणारे फलंदाज खेळपट्टीचा अंदाज घेताना बिचकत खेळत होते, त्याच खेळपट्टीवर ईशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. हा सगळा परिणाम त्याने खेळात खूप काही बदल केल्याने होत आहे, असे नाही. त्याने फक्त विचारात बदल केले म्हणून खूप मोठा परिणाम तो साधत आहे.