

Maharashtra Monsoon 2026
esakal
रोहित जोशी - rohitjoshi77@gmail.com
गावाकडच्या लोकजीवनात निसर्ग केवळ सृष्टीचा भाग नसतो; तर तो भविष्याचा संकेत देणारा साथीदारही असतो. निसर्गातील असंख्य खुणांमधून पाऊस अन् दुष्काळाचे अंदाज बांधले जातात. यंदा जांभळाच्या भरघोस उत्पादनावरून दुष्काळाच्या चर्चांना उधाण आले असताना, अशा लोकसमजुतीमागील विज्ञान आणि यंदाच्या मॉन्सूनचे वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच जांभळाच्या बहरापासून ‘सुपर एल निनो’पर्यंतच्या चर्चेचा वैज्ञानिक वेध घेणे क्रमप्राप्त ठरते.
उन्हाळ्याची सुट्टी लागली, की गावी जायचे आणि तिथे आजीच्या मांडीवर डोके ठेवून गप्पा मारायच्या, हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता आठवण-कप्पा असतो. ग्रामीण महाराष्ट्रात शेती आणि निसर्ग यांचा अगदी जवळचा संबंध आहे. पाऊस कधी पडणार, पीक कसे येणार, याचे अंदाज शेतकरीबांधव आणि जुनीजाणती मंडळी निसर्गाच्या खुणांवरून बांधत असतात. पक्ष्यांनी घरटी कुठे बांधली आहेत, कोणत्या झाडाला किती मोहोर आला आहे इत्यादी मुद्द्यावरून पावसाचे आडाखे बांधले जातात. अशाच एका कडक उन्हाळ्यात, अंगणात झाडाखाली जांभळांचा अक्षरशः सडा पडलेला असतो तेव्हा आजी सहजच म्हणते, ‘जांभळाचा असा सडा पडतो त्या वर्षी नक्की दुष्काळ पडतो, बरं का!’
आजीचे हे पारंपरिक ज्ञान अनेक पिढ्यांच्या निरीक्षणातून आलेले असते. काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवरही अशीच एक पोस्ट वेगाने फिरत आहे, ज्यात आजीच्या या दाव्याला ‘स्ट्रेस फ्रूटिंग’ (Stress Fruiting) किंवा ‘मास्टिंग’ (Masting) असे वैज्ञानिक नाव देऊन, यंदाच्या जांभळाच्या बंपर उत्पादनावरून २०२६ मध्ये महाराष्ट्रात महाभयंकर दुष्काळ पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे; पण यात तथ्य किती? आजीबाईंचे हे भाकीत हवामानशास्त्राच्या कसोटीवर खरेच टिकते का? यंदाच्या मॉन्सूनचे खरे वैज्ञानिक चित्र काय आहे? याचा आपण सविस्तर वेध घेऊ या...