

Climate Change in Konkan
esakal
शिवप्रसाद देसाई
कोकणातील स्थिती गंभीर असण्याबरोबर गुंतागुंतीचीही आहे. पूर्वी चाकरमान्यांकडून येणाऱ्या मनिऑर्डरवर या भागाचे बरेचसे अर्थकारण चालायचे. तरुण नोकरीसाठी मुंबई गाठायचे. गावाकडे कुटुंबातील एखादा भाऊ, त्याचे कुटुंब नाहीतर म्हातारे आई-वडील वर्षाला पुरेल इतकी भातशेती करायचे. नारळ, सुपारी, काजू, आंबा यांची मर्यादित झाडे, किनारपट्टीवर पारंपरिक मासेमारी असे उत्पन्नाचे तुटपुंजे स्रोत होते. अर्थात त्या काळात कोकणात जगण्यासाठीच्या अपेक्षाही मर्यादित होत्या. विकासाची व्याख्या गावात रस्ते, शाळा, वीज आणि एसटी अशी चौकोनी होती. परिस्थिती बदलली. फलोत्पादन योजनेतून फळबाग क्रांती झाली. हापूस, काजूसह इतर पिकांचे क्षेत्र वाढले. फळबागायती बऱ्यापैकी व्यावसायिक झाली. मासेमारी क्षेत्रातही यांत्रिकीकरण आले. बाजारपेठ विस्तारल्याने मासळीला चांगला दरही मिळू लागला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कोकणातच रोजगाराच्या संधी विस्तारल्या. नवी पिढी याच प्रांतात स्थिरावू लागली. यातून हळूहळू मनिऑर्डरवरचे अवलंबित्व कमी झाले.
गेल्या दहा वर्षांपासून कोकणच्या अर्थकारणाचे मुख्य स्रोत असलेल्या शेती-बागायती आणि मासेमारी या क्षेत्रावर वातावरण बदलाचे आघात सुरू झाले. शेतीचा विचार करता भातपिकावर याचा परिणाम खूप मोठा आहे. वर्षभर पुरेल इतके धान्य पिकवणाऱ्या कुटुंबांची संख्या हजारोंच्या घरात आहे; मात्र पावसाचे वेळापत्रक बिघडल्याने भातशेतीत नुकसान वाढत गेले. यामुळे पडीक क्षेत्रात वाढ झाली आहे.