Maharashtra Municipal Election
Esakal
संजय जोग, ज्येष्ठ पत्रकार व आर्थिक विश्लेषक
मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका होत असून, सत्ताधारी महायुतीसाठी संपूर्ण नियंत्रणाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर, विरोधकांसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. या महापालिकांचा एकत्रित अर्थसंकल्प १.२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, त्यातून मिळणारा ‘ऑक्सिजन’ही राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ शहरांवरील नियंत्रण कोणाचे, याबरोबरच राज्याच्या राजकारणात भविष्यात सुसंगत राहण्याचा संघर्ष असेल.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून, सत्ताधारी महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी बाह्या सरसावल्या आहेत. राजकीय पकड मजबूत करण्यासाठी आणि शहरांच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण मिळविणे, विकास धोरणांची अंमलबजावणी करणे आणि महत्त्वाकांक्षी ‘विकसित भारत २०४७’साठी फायदेशीर ठरेल, यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसाठी या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात सुसंगत राहण्यासाठी आणि गमावलेली प्रतिष्ठा परत मिळविण्याचा विरोधी पक्षांचा, विशेषतः महाविकास आघाडीचा प्रयत्न असले. या निवडणुकांमुळे राज्याच्या शहरी अर्थव्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे. त्यामुळेच, या निवडणुकांचा वेगळ्या कंगोऱ्यातून विचार करणे अत्यावश्यक आहे.