

Prahar Divyang Kranti Andolan
esakal
आम्ही दिव्यांग बांधवांना आज अधिकार मागताना पाहत आहोत... त्यांना संघर्षातून स्वतःचा स्वाभिमान उभा करताना पाहत आहोत. हा बदल एका दिवसात झालेला नाही. तो हजारो वेदना, आंदोलनं, संघर्ष आणि अश्रूंमधून उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या दिव्यांग बांधवाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत ‘प्रहार’चा झेंडा रस्त्यावर दिसत राहील.
‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले...’ संत तुकाराम महाराजांचा हा विचार महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेला आहे. छत्रपती शिवरायांनी रयतेचा विचार केला, राजर्षी शाहू महाराजांनी वंचितांना न्याय दिला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून समानतेचा अधिकार दिला, गाडगेबाबांनी समाजाला माणुसकी शिकवली आणि तुकडोजी महाराजांनी दुर्बलांच्या वेदनेला आवाज दिला. हा महाराष्ट्र नेहमीच वंचितांच्या पाठीशी उभा राहिला आहे; पण याच महाराष्ट्रात आम्हाला एक अशी वेदना दिसली, की अंतःकरण ढवळून निघालं. ती वेदना होती, दिव्यांग बांधवांची. मतदारसंघात फिरताना, महाराष्ट्रभर दौरे करताना, सरकारी कार्यालयात जाताना आम्ही अनेक दिव्यांग बांधव पाहिले. कुणी काठी टेकून सरकारी कार्यालयाच्या दारात उभं होतं, कुणी व्हीलचेअरवरून पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत होतं, कुणाला बोलता येत नव्हतं, कुणाला ऐकू येत नव्हतं; पण त्याहून मोठी वेदना म्हणजे समाज आणि प्रशासन त्यांच्याकडे पाहण्याची पद्धत होती. दिव्यांग व्यक्ती म्हणजे दयेचा विषय, ओझं किंवा उपकार करून जगवायचा माणूस, अशी मानसिकता समाजात निर्माण झाली होती. सरकारी यंत्रणेसाठी तो फक्त एक अर्ज होता; तर समाजासाठी तो सहानुभूतीचा विषय होता... पण सन्मानाने पाहणारे लोक फार कमी होते. आम्हाला त्या दिवशी जाणवलं, की शरीराने दिव्यांग असलेला माणूस इतका तुटलेला नसतो, जितका समाजाच्या वागणुकीने आणि व्यवस्थेच्या दुर्लक्षाने तो तुटतो आणि तिथूनच मनात एक संघर्ष पेटला - या माणसाला दया नको, त्याला अधिकार मिळाले पाहिजेत.