

UP Assembly Elections 2027
esakal
उत्तर प्रदेशातील निवडणुकांना अद्याप १४ महिने बाकी आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींनी बहुजन समाज पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपच्या मोठ्या वादांवर बहनजी मौन बाळगतात किंवा मग त्यांचा रोख समाजवादी पक्ष, काँग्रेसकडे असतो. यावरूनच त्यांचा नक्की हेतू काय आहे, हे स्पष्ट होते. मायावती या निवडणुकीकडे किती गांभीर्याने पाहतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक १४ महिन्यांवर आल्या आहेत. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत त्या कोणते ‘ट्रम्प कार्ड’ खेळणार, याकडेही अनेकांची नजर आहे. त्यांनी उत्तर प्रदेशात पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. २००७ मध्ये त्यांनी पूर्णपणे स्वबळावर सत्ता मिळवली होती. त्यापूर्वी त्यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशवर राज्य केले. मात्र, ते भाजपच्या पाठिंब्याने होते. त्यानंतर त्यांचे नशीब त्यांना साथ देईना आणि पक्ष सत्तेपासून दूर होत गेला. आता त्यांनी ‘बहुजन मिशन २०२७’ या नावाने एक योजना जाहीर केली आहे. अर्थात असे असूनही २०२७च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला काही आशा आहे का, हा प्रश्न कायम आहे.
मायावती यांचा पक्ष खालच्या पातळीवर घसरला आहे. मायावती या सत्ताधारी भाजपच्या ‘बी’ टीमप्रमाणे वागत असल्याचाही आरोप सातत्याने त्यांच्यावर होत आहे. त्यांची निष्क्रियता आणि पक्षाला आलेले शैथिल्य मागील दोन निवडणुकांमध्ये दिसून आले. २०२२ मधील उत्तर प्रदेशची निवडणूक असो किंवा मग २०२४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक. या दोन्ही निवडणुकांत बहुजन समाज पक्ष कोठेही दिसला नाही. पक्षाचे अस्तित्वही दिसले नाही.