

Mukkam Post Bombilwadi National Award
esakal
एखादी कथा मनाला भिडते, तिच्यावर विश्वास बसतो आणि मग ती पडद्यावर आणण्यासाठी सुरू होतो एक दीर्घ प्रवास. त्यात असतात स्वप्नं, जोखीम, संघर्ष आणि असंख्य अनुभव. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपटासाठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्ताने अभिनेत्री, लेखिका आणि निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांनी आपल्या सर्जनशील सहप्रवासाचा मागोवा घेतला आहे. चित्रपट निर्मितीची भूमिका, पुरस्कारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, लेखनाची प्रक्रिया आणि परेश मोकाशी यांच्यासोबतच्या कलात्मक संवादाबद्दल त्यांनी व्यक्त केलेले मनोगत...
आमच्या ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे. कोणताही पुरस्कार मिळाला, की आनंद होतोच; पण राष्ट्रीय पातळीवरचा गौरव म्हणजे देशाकडून आपल्या कामाची मिळालेली शाबासकी, अशी भावना मनात निर्माण होते. साहजिकच या सन्मानाचा आनंद अधिकच मोठा असतो. हा पुरस्कार आपल्या कामाची दखल घेतली गेल्याची जाणीव करून देतो आणि आपल्या पद्धतीने कथा सांगण्याचा आत्मविश्वास अधिक दृढ करतो.