

Marathi Film Production Journey
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
सेन्सॉरच्या सदस्यांपैकी काहींना आवडला... काहींना नाही. थोडी थोडी माहिती बाहेर येत होती... नंतर कळलेला वृत्तान्त असा, की वाद झाल्यावर त्यांच्यात बहुमत घ्यायचं ठरलं... मतदान झालं... निर्णय कळवायला आम्हाला आत बोलावलं... सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता.. तो ताण आम्हाला आणखीन घाबरवून टाकत होता. अखेर त्यांनी निर्णय सांगितला. हा सिनेमाच नव्हे... हा सिनेमा आम्ही नाकारतो आहोत.
‘हा सिनेमा थोडा रिस्की आहे,’ - मी
‘नाही पण आपण हाच करू...’ - निर्माते
माटुंगा जिमखान्यामध्ये संजय खामकर यांना मी दोन सिनेमांच्या गोष्टी ऐकवल्या. त्यातली एक सरळ सरळ फिल्म होती. एकीचा विषय थोडा गंभीर होता. कोणती करू या कथा? कशावर करायचा चित्रपट, ते एकदा म्हणाले.
‘नाच तुझंच लगीन हाय’ करू या. त्यावरचा आमचा हा उपरोक्त संवाद.
राष्ट्रीय नाट्य विद्यालय ‘एनएसडी’ला जायच्या आधी मी या कथेवर याच नावाचं नाटक लिहिलं. काही तालमी झाल्या. पण नाटक पूर्णत्वास गेलं नाही. स्टेजवर सादर झालं नाही. आता त्याच कथेवर सिनेमा करायचा होता. तयारी सुरू झाली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते माझे समकालीन प्रताप नायर (डीओपी ) निलांजन दत्ता (संकलक) कामोद खराडे (ध्वनी) आणि मंगेश धाकडे (संगीत) अशी तांत्रिक विभागाची हेड असलेली नावं ठरली... या सगळ्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या क्षेत्रातल्या नैपुण्याबद्दल राष्ट्रपतींकडून या सगळ्यांचा सन्मान झालेला आहे. आता कलावंत निवडायचे होते. याकामी तेव्हा माझे सहायक दिग्दर्शक असलेले सतीश नाईक, कविता दातीर, अमित सोनावणे यांची मोलाची मदत झाली. त्यांनी अगदी योग्य माणसं पुढ्यात आणून उभी केली. त्यातलीच छाया कदम ही अभिनेत्री. तिचा पहिला-दुसरा सिनेमा असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्माता हे छाया कदम यांचे मित्र होते. तिच्या संपर्कातूनच ही बोलणी झाली होती. तंत्रज्ञ ठरले, कलाकारही बऱ्यापैकी ठरले. मी आणि कॅमेरामन प्रताप बरंच फिरलो. त्याच्या मनासारखं म्हणजे सूर्यप्रकाश, सावल्या, टॉप लाइट या सगळ्या त्याच्या निकषावर लोकेशन उतरत नव्हते आणि चित्रीकरण स्थळंही खूप होती. दर दोन दिवसांनी युनिट हलवणं (शिफ्टिंग) सगळ्याचं अंगांनी जिकिरीचं होतं... मानसिंग पवार (पूर्वी टी.व्ही. वर गप्पागोष्टी, आमची माती आमची माणसं करणारे) यांच्यासोबत मी आणि आदिती सारंगधर यांनी आकांत (जो आता यू ट्युबवर आहे) नावाचा सिनेमा केला होता. त्याचं बरंचसं शूटिंग दादा कोंडके स्टुडिओमध्ये पार पडलं होतं. ती जागा आठवली. प्रताप नायरला आम्ही तिकडे घेऊन गेले. त्यानं तो सगळा परिसर आपल्या लेन्समधून पाहिला. उन्हामुळे डोळे मिचकावत हसला...