

डॉ. व्यंकटराव घोरपडे
vyankatrao.ghorpade@gmail.com
शिर्डीला आलेला भाविक मोठ्या मायेने परिसरातील भटक्या श्वानांना प्रसादातील लाडू किंवा पेढे भरवत असल्याने त्यांच्यात लठ्ठपणा आल्याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित झाली. भाविकांची भूतदया त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरताना दिसून येतेय. इथे गरज आहे ते तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांचे प्रबोधन करण्याची.
दररोज आपण विविध माध्यमांतून श्वानदंशाच्या बातम्या वाचत असतो. श्वानांच्या उपद्रवाच्या अनेक घटना आपण पाहत किंवा ऐकत असतो. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण विशेषतः लहान मुले बळी पडतात. श्वानदंशामुळे रेबीजची लागण होते. वर्षाला जवळजवळ २० ते २५ हजार नागरिक रेबीजमुळे मृत्युमुखी पडतात, अशीही एक आकडेवारी सांगते; मात्र काही दिवसांपूर्वी कुत्र्यांबाबत आलेली एक बातमी भूतदया पाळणारे भाविक आणि प्राणीप्रेमींनाही विचार करायला लावणारी आहे.