
Balochistan Fight Against Government Mahrang Baloch
बलुचिस्तानात पाकिस्तान सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात सुरू असलेल्या चळवळीचे नेतृत्व दोन महिला करीत आहेत. येत्या २५ जानेवारीला ‘बलुचिस्तान नरसंहार स्मरण दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन त्यांनी केले असून त्यानिमित्त तेथील मानवी हक्कांच्या स्थितीचा घेतलेला आढावा.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात परिस्थिती स्फोटक आहे. बलूच लोकांसाठी तणाव, अशांतता, हल्ले, तरुणांचे अपहरण इत्यादी गोष्टी रोजच्याच झाल्या आहेत. पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून असे होते आहे. बलुचिस्तान २२७ दिवस स्वतंत्र होता. मोहम्मद अली जिना यांच्या आदेशावरून २७ मार्च १९४८ला पाकिस्तानच्या लष्कराने बलुचिस्तानातील सर्वात मोठ्या कलात संस्थानवर आक्रमण केले आणि त्याला पाकिस्तानात जबरदस्तीने विलीन केले. कलातच्या अहमद यार खान यांनी विलीनीकरण करारावर सही केली, हे केवळ सांगण्यापुरते. मात्र लोक स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढत राहिले. २३ मार्च १९४० ला लाहोर येथे झालेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात एकही बलूच नेता उपस्थित नव्हता. तिथे ‘लाहोर प्रस्ताव’ मंजूर करण्यात आला. खरे तर तो `पाकिस्तान प्रस्ताव’ होता.