

Pandharpur Wari
esakal
डॉ. अपर्णा बेडेकर - aparnabedekar@gmail.com
चोवीसावेगळ्या आणि सहस्राआगळ्या विठ्ठलाची वारी हा दर आषाढात येणारा एक अलौकिक पर्वकाळ आहे. पंढरीचा विठ्ठल हा केवळ देव नाही, तर महाराष्ट्राच्या लोकजीवनात मिसळलेलं प्रेम, समता, भक्ती आणि समन्वयाचं जिवंत प्रतीक आहे. वारी म्हणजे साऱ्या संवेदनांचा उत्सव झालाय. वारकरी केवळ पायाने वारी चालतोय असं नाही; तर त्याचं मन, त्याचं चित्त, त्याच्या साऱ्या संवेदना भक्तीच्या आषाढसरी अनुभवताहेत...
महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः।
समागत्य तिष्ठन्तमानंदकंदं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥
‘पांडुरंगाष्टकम्’ या स्तोत्रात श्रीविठ्ठलाची आराधना करताना भगवान आदी शंकराचार्यांनी पंढरपूरला ‘महायोगपीठ’ म्हटलं. द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण विठ्ठलरूपात इथे अवतरला. पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा... अशी देवभक्ताची भेट झाली आणि चंद्रभागेच्या तीराला अलौकिक तीर्थाचं महत्त्व प्राप्त झालं. हे क्षेत्र महायोगपीठ झालं. श्रीविठ्ठल पुंडलिकासाठी उभा राहिलाच; परंतु त्याने आपलं आराध्य असलेलं शिवलिंग परम श्रद्धेने माथ्यावर घेतलं म्हणून शैव-वैष्णवांचा महायोग असलेलं हे स्थान महायोगपीठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.