

Potraj Tradition
esakal
पोतराज म्हणजे केवळ देवीचा भक्त किंवा भिक्षा मागणारा लोककलावंत नव्हे. तो मातृदेवतेच्या उपासनेचा, गाव रक्षणाच्या लोकविश्वासाचा आणि तांत्रिकांच्या परंपरेच्या प्राचीन वारशाचा वाहक आहे.
शाक्त आणि तांत्रिकांचा मूळ वारसा जपणारा पोतराज हा कृषिमायेचे गुणगाण गातो. पोतराज होण्यासाठी त्याला दीक्षा घ्यावी लागते. यात पहिला टप्पा हा कानसवारणीचा असतो. ‘कानसवारणी’ म्हणजेच त्याला कानामध्ये पहिला मंत्र दिला जातो. पोतराज होण्याच्या टप्प्यातील हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. ही दीक्षा म्हणजेच पोतराज होण्यासाठी आणि पुढे लोकसंस्कृतीचा वारसा चालविण्यासाठी लोकमान्यता मिळवून देणारा विधी असतो. यातून भारतीय प्राचीन लोकसंस्कृतीचा आणि विशेषतः मातृदेवतांच्या परंपरेचा मोठा गौरव केला जातो.
‘इरडं’ हा पोतराजाला दीक्षा देणारा विधी असतो. साधारणपणे चैत्राच्या पौर्णिमेला या विधीला सुरुवात होते. पुढे वैशाख आणि आषाढच्या महिन्यापर्यंत हे विधी चालतात. ही दीक्षा म्हणजे एक प्रकारे तांत्रिकांमध्ये असलेल्या गुरुकुल पद्धतीसारखाच एक प्रकार असतो. याला ‘कानसवारणी’ असेही म्हणतात. मुलांना बालपणीच पोतराज होण्याची ही दीक्षा देऊन त्यासाठी तयार केले जाते. एकदा हा विधी झाल्यानंतर त्याला त्या लोकसंस्कृतीत एक सन्मानाचे स्थान मिळते. पुढे तो मोठा झाल्यानंतर त्याला बीजमंत्र, पट फोडणे आदी कार्यक्रम केले जातात. त्यातही अनेक विधी असतात; मात्र त्याची पहिली सुरुवात ही ‘इरडं’ने होते. सोलापूर, धाराशिवपासून ते विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा विधी अजूनही केला जातो. मूळ गाभा कमी झाल्याने पूर्वी सात दिवसांपर्यंत चालणारा हा विधी अलीकडे एका दिवसापर्यंत येऊन ठेपला आहे.