

Memories Art Exhibition
esakal
मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार प्रमोद सहस्रबुद्धे यांनी साकारलेली ‘मेमरीज’ ही चित्रमालिका नेहरू सेंटरच्या कलादालनात प्रदर्शित होत आहे. ही मालिका म्हणजे एका कालखंडाचा आरसा आहे. त्यातील बऱ्याच गोष्टी आता कदाचित कालबाह्य वाटतील; पण तो एका पिढीला घडवणारा आलेख आहे.
प्रत्येकाच्या आयुष्याचा पट हा त्यांचा त्यांचा एक कालखंड असतो. त्या काळाचे ओरखडे त्यांच्या जगण्यावर उमटत असतात. काळ बदलतो, तशा काही गोष्टी कायमस्वरूपी पुसल्या जातात. आठवणी मात्र स्मृतिपटलावर कायमच कोरलेल्या असतात. ज्यांनी आयुष्याची आज साठी ओलांडली असेल, त्यांच्यासाठी तर साठ वर्षांपूर्वीचा काळ आणि आज यात सर्वार्थानेच प्रचंड उलथापालथ झालेली दिसते. ही ६० वर्षे दोन भागांत विभागली, तर जागतिकीकरणाआधीची ३० आणि नंतर हळुवार दिवसागणिक झालेली तीस वर्षांतील स्थित्यंतरे चकित करणारी वाटतात. हाच धागा घेऊन प्रसिद्ध चित्रकार प्रमोद सहस्रबुद्धे यांनी साकारलेली ‘मेमरीज’ चित्रमालिका आठवणींचा एक समृद्ध दस्तऐवज आहे.
८ ते १४ सप्टेंबरदरम्यान वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत होणाऱ्या या प्रदर्शनातील कलाकृती सहस्रबुद्धे यांच्या चित्रांपेक्षा त्यांच्या स्मृतींमुळे लक्षवेधी ठरतात. स्मृती केवळ आठवणी म्हणून कॅनव्हासवर आलेल्या नाहीत. त्या एका काळाचे दृश्य-रूप बनल्या आहेत. बालपणापासून शाळेपर्यंत, खेळांपासून वसतिगृहापर्यंतचा एक वैयक्तिक प्रवास या चित्रांमधून उलगडतो.