भारतात रस्त्यांचा शोध कधी लागला? कसा झाला त्यांचा विकास, जाणून घ्या
प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्याला अप्रूप असेलच असं नाही. पण, काही गोष्टींच्या शोधाबद्दल, तसंच त्याच मूळ जाणून घेण्याबाबत आपल्या मनात नेहमीच उत्सुकता असते. जसे की चाकाचा शोध, टेलिफोन किंवा टीव्हीचा शोध, अशी काही उदाहरणं देता येतील. मात्र, दररोज दळणवळणासाठी आपण ज्या रस्त्याचा वापर करतो, त्या रस्त्याचा शोध कधी अन् कसा लागला असेल, याबद्दल तुमच्या मनातही प्रश्न निर्माण झालाय ना? चला तर मग रस्त्याच्या मुळापर्यंत जाऊयात.
पादचारी किंवा वाहनचालकाला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी केलेला जमिनीवरील मार्ग म्हणजे रस्ता. चाके जोडलेल्या वाहनाचा शोध लागण्यापूर्वी माणसांच्या वर्दळीमुळे तयार झालेल्या 'पायवाटा' हेच दळणवळणाचं प्रमुख साधन होत. त्यात गावातील अंतर्गत मार्ग जसे की गल्लीबोळ, दोन गावांना जोडणारा मार्ग. मोठ्या शहरांना व राज्याच्या राजधान्यांना जोडणाऱ्या मार्गाला 'महामार्ग' असं संबोधल जातं. रेल्वेमार्ग प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, तसंच रस्त्यांवरील वाहतूक जलद होत असल्यामुळे रस्तेच दळणवळणाचे प्रमुख अन् सोईस्कर साधन बनलं. लष्कर अन् लष्करी साहित्य हलवणे, उत्पादित वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी पोचवण्यासाठी रस्त्यांची गरज आहे. जसजशी उद्योगधंद्यांची वाढ होत गेली, तसतशी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता भासू लागली. परिणामी, शास्त्रीय ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर रस्त्यांमध्ये सुधारणा होत गेली. मात्र, रस्ते बनविताना काही अडचणी यायला लागल्या, त्यात नद्या, डोंगर, दऱ्या ओलांडण्यासाठी पूल व बोगद्याची प्रगत पद्धत शोधण्यात आली.