काशी, मणिकर्णिका घाट आणि ‘स्मशान’ शांतता!काशीतील मणिकर्णिक या घाटावर दिवसभरात ३०० ते ५०० जणांवर दाहसंस्कार केले जातात. मृतावर गंगेच्या काठावर अंत्यसंस्कार करून गंगेत त्याच्या अस्थींचं विसर्जन केल्यानंतर मृतात्म्याला थेट स्वर्गाची दारं खुली होतात, असं म्हटलं जातं. त्यासाठीचाच हा सारा खटाटोप असतो. या घाटावर मी १० मिनिटं उभं राहिलो, काही फोटो काढले, व्हिडिओ शूटिंगही केलं. जळणारे मृतदेह, मोठ्या बांबूच्या साहाय्याने चिता सावरणारे तेथील कर्मचारी आणि बाजूला उभे असलेले शोकाकूल नातेवाईक असंच चित्र प्रत्येक चितेच्या भोवती दिसत होतं...देशातील अंत्यसंस्कारांसाठीचं सर्वांत ‘पवित्र’ स्थान असलेल्या गंगेच्या मणिकर्णिका घाटावरचा हा अविस्मरणीय अनुभव...(Experience on Kashi Manakarnika Ghat)
एखादं शहर काही कारण नसताना आपल्या मनात खोलवर जाऊन बसतं. लहानपणापासूनच अशा शहरांची यादी मनात घर करते. अनेकांनी काशीला (Kashi) गेल्यावर तिथं कलयुगाशी संपर्क तुटल्याची भावना अनुभवतात, असं सांगितलं होतं. काशीत गेल्यावर हा अनुभव घेण्यासाठी मी मणिकर्णिका या घाटावर जाण्याचा निर्णय घेतला. नीरज घायवान यांच्या ‘मसान’ (Maasan) या चित्रपटात हा घाट आणि तिथले अंत्यविधी, ही काम करणाऱ्या लोकांची कैफियत पाहिली होती.